…तर नरेंद्र मोदींचा झाला असता पराभव

…तर नरेंद्र मोदींचा झाला असता पराभव

वाराणसीत प्रियांका वड्रांनी निवडणूक लढविली असती तर… : राहुल गांधींचा दावा
वृत्तसंस्था/ रायबरेली
प्रियांका वड्रा यांनी वाराणसी येथून निवडणूक लढविली असती तर नरेंद्र मोदी हे मोठ्या फरकाने पराभूत झाले असते असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाच्या जनतेने त्यांचे राजकारण पसंत पडले नसल्याचा संदेश दिला आहे. देशाची जनता द्वेष अन् हिंसेच्या विरोधात असल्याचे राहुल गांधी यांनी रायबरेली येथील सभेत बोलताना म्हटले आहे.
काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते तसेच अमेठी आणि रायबरेलीच्या जनतेचे मी आभार मानू इच्छितो. यावेळी काँग्रेस पक्ष अमेठी, रायबरेली, उत्तरप्रदेश आणि पूर्ण देशात एकजूट होऊन लढला. समाजवादी पक्षाच्या नेत्यांनीही काँग्रेस नेत्यांसोबत मिळून निवडणूक लढविली असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले आहेत.
अमेठीत जनतेने किशोरीलाल शर्मा यांना तर रायबरेलीत मला विजयी केले. तर उत्तरप्रदेशात इंडिया आघाडीच्या खासदारांना निवडून आणले. यामुळे पूर्ण देशाचे राजकारण बदलले आहे. राज्यघटनेला हात लावला तर खबरदार असा संदेश जनतेने पंतप्रधान मोदींना दिला असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून विजय मिळविल्यावर राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा यांनी मंगळवारी पहिल्यांदाच रायबरेलीचा दौरा केला आहे.