लेंडीनाल्याची बदलली दिशा
शिवारात शिरले पाणी : शेतकऱ्यांचे झाले नुकसान
बेळगाव : वळिवाच्या दणक्याने शहरातील पाण्याचा लोंढा लेंडीनाल्याद्वारे राष्ट्रीय महामार्गाकडे गेला. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील पाईप ब्लॉक झाल्यामुळे ते पाणी माघारी फिरुन शिवारात शिरले. लेंडी नाला फुटून अनेकांच्या शेतामध्ये पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्याच दमदार वळीव पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका बसला असून आता तरी शेतकऱ्यांकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. समर्थनगरपासून लेंडीनाला तुडुंब भरून वाहत होता. यावेळी जोतिबा पावशे यांच्या शेतामध्येच लेंडीनाला फुटून नाल्याचे पाणी शिवारात शिरले.
यामुळे मिरचीपिक तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता या पावसाचा निचरा होणे अशक्य असून तातडीने राष्ट्रीय महामार्गावरील हे पाईप खुले करावे, अशी मागणी होत आहे. लेंडी नाल्याच्या दुरुस्तीबाबत गेल्या तीन वर्षांपासून बेळगाव शेतकरी संघटनेने पाठपुरावा केला. लेंडी नाला दुरुस्ती करण्याबाबत मनपाला पत्रही पाठविण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दरवर्षी शेकडो एकर जमिनीतील पिक वाया जात आहे. यावर्षीही पुन्हा या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दणका बसला आहे. यामुळे संताप व्यक्त होत असून पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
लेंडीनाल्याची बदलली दिशा
2 months ago