स्मार्ट सिटीची कामे अर्धवटच

स्मार्ट सिटीची कामे अर्धवटच

घाईगडबडीत कामे उरकण्याचा सपाटा : पावसाळा जवळ आल्याने नागरिकांमध्ये भीती
पणजी : राजधानी पणजीतील स्मार्ट सिटीची अनेक कामे अर्धवट असून ठरलेल्या मुदतीत म्हणजे 31 मेपर्यंत ती पूर्ण होतील की नाही याबाबत साशंकता असल्याचे समोर आले आहे. सदर मुदत संपण्यासाठी आता फक्त 15 दिवस (पंधरवडा) शिल्लक राहिले असून ती तारीख जवळ येत असतानाच नव्याने काही कामे हाती घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. काही कामे वर्ष झाले तरी पूर्ण झालेली नाहीत. त्याकडे कंत्राटदाराने दुर्लक्ष केले असून जी कामे पूर्ण झाली म्हणून सांगितली जातात ती अपूर्णच आहेत असे नीट पाहिल्यानंतर कळते. अनेक कामे पूर्ववत झालेली नाहीत आणि ती कशीतरी पूर्ण करण्यात आल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे स्मार्ट सिटीचे पुढे काय होणार? हा मोठ्या प्रश्न आहे.
कोट्यावधी खर्च कऊन ती कामे करण्यात येत आहेत. त्यावर कोणाची देखरेख नाही आणि नियंत्रण तर नाहीच नाही. पणजी महापालिका तर स्मार्ट सिटीकडे फारसे लक्ष देत नाही आणि समस्या निर्माण झाली रे झाली की अंग काढून घेण्यात येते. इमॅजिन पणजी कंपनीतर्फे स्मार्ट सिटीची कामे करण्यात येतात परंतु त्या कंपनीचे आणि पणजी मनपाचे कधी जमत नाही आणि त्यांच्यात समन्वय कधीच होत नाही हे वेळोवेळी दिसून आले आहे. आता अंतिम मुदत जवळ येत असल्याने कामे लवकर संपावीत म्हणून घाईगडबड करण्यात येत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.आता पाऊस जवळ आल्यामुळे आणि अधून-मधून एक-दोनदा तो पडल्यामुळे पणजीतील स्मार्ट सिटी कामांचे काय होणार? अशी विचारणा पणजीतील लोक करीत आहेत. अनेक ठिकाणची कामे, रस्ते पूर्ववत झालेले नाहीत. ते वर-खाली, चढ-उतार असल्यामुळे दुचाकीस्वारांना धोकादायक ठरणारे आणि अपघातास निमंत्रण देणारे आहेत, असे अनेकांनी सांगितले. येत्या 31 मे पर्यंत पणजीतील सर्व कामे संपणार आणि पणजी नगरी खरोखरच स्मार्ट होणार काय? की सध्या आहे तशीच ख•sमय राहाणार? अशी विचारणा सातत्याने होत आहे.