कंग्राळी बुद्रुक स्मार्ट बसथांबा कुचकामी

कंग्राळी बुद्रुक स्मार्ट बसथांबा कुचकामी

बसथांबा बनलाय अवैध व्यवसायाचा अड्डा : टोळक्यांकडून बसस्थानकातील साहित्याची मोडतोड : संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायत कार्यालयाला लागून शासकीय निधीतून उभारण्यात आलेला स्मार्ट बसथांबा प्रवाशाविना अवैध व्यवसायाचा अड्डा बनला आहे. प्रवाशांसाठी शासनाने बांधण्यात आलेल्या या स्मार्ट बसथांब्यामध्ये वयस्कर नागरिकांबरोबर काही समाजकंटकांकडून स्टार-गुटखा खाऊन थुंकणे, दिवस-रात्र बसथांब्यामध्येच बसून राहत असल्यामुळे सदर बसथांब्याकडे प्रवाशांनी पाठ फिरविल्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत. समाजकंटकांकडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, शासकीय इमारतीमध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरविणे हे सुरूच आहे. ग्रा. पं. ने इकडे त्वरित लक्ष देऊन समाजकंटकांना आवर घालून या थांब्याचे पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याची मागणी प्रवासी वर्ग व ग्रामस्थांतून होत आहे. शासनाने शहरी भागाबरोबर तालुक्यातील गावोगावी स्मार्ट बसथांब्याची उभारणी करून उन्ह, पावसापासून गैरसोय होणाऱ्या प्रवासी वर्गाची चांगली सोय केली असल्याचे प्रत्येक गावामध्ये दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंग्राळी बुद्रुक गावामध्ये नवीन ग्रा. पं. कार्यालयाला लागूनच शासकीय निधीतून बसथांबा उभारण्यात आला. परंतु सदर बसथांब्यामध्ये प्रवासी वर्गापेक्षा विशिष्ट मंडळी व काही समाजकंटक टोळकी या थांब्यामध्ये बसून शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, स्टार-गुटखा खाऊन भिंतीवर थुंकणे, इतर अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असून या समस्येवर तोडगा काढून प्रवासी वर्गासाठी हा बसथांबा सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
तरुणी-महिलांची छेड काढण्याचेही प्रकार
सदर बसथांब्यामध्ये सायंकाळी 8 ते 10 तरुणांच्या टोळक्यांकडून रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणी व महिलांची छेड काढण्याच्याही प्रकारांत वाढ झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे या टोळक्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.
गांजा विक्रीचाही सुळसुळाट
कंग्राळी बुद्रुक गावातील काही मोक्याच्या ठिकाणी दररोज राजरोसपणे किरकोळ गांजा विक्रीसाठी उधाण आले आहे. यामध्ये प्रामुख्याने 16 ते 20 वयोगटातील मुलांचाही सहभाग असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. पोलीस खात्याच्या आशीर्वादानेच सदर व्यवसाय सुरू असल्याचेही नागरिकांतून सांगितले जात आहे. ग्रा. पं. च्या संबंधित अधिकारी वर्गाने या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्मार्ट बसथांब्याचा प्रवासी थांब्यासाठी उपयोग व्हावा यासाठी लक्ष द्यावे. तसेच अवैध व्यवसायही बंद करून आजच्या तरुण वर्गाला यातून बाहेर काढावे, अशी मागणीही होत आहे.