‘हे’ आहेत एनडीए सरकारमधील ‘शिलेदार’

‘हे’ आहेत एनडीए सरकारमधील ‘शिलेदार’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रविवारी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या भव्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकूण ७२ मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधीदरम्यान राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींनंतर दुसऱ्यांदा शपथ घेतली. अमित शहा, नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांच्यासह एकूण ३० कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. पाहा मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमधील मंत्री…
राजनाथ सिंह
अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर पक्षाचे अध्यक्षपद दोनवेळा भूषवण्याची संधी मिळालेले एकमेव नेते म्हणजे राजनाथ सिंह. १३ व्या वर्षी संघात दाखल झालेले राजनाथ सिंह यांनी २००० ते २००२ या कालावधीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद, तर २०१४ ते २०१९ या कालावधीत गृहमंत्रिपद भूषवले आहे.
अमित शहा
सातत्याने निवडणुका जिंकणारे दिग्गज राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शहा ! १९८९ ते २०१४ या कालावधीत शहा यांनी गुजरात राज्य विधानसभेसह विविध स्तरांवरील छोट्या-मोठ्या ४२ निवडणुका लढवल्या आणि बहुतांश वेळा ते निवडूनही आले. गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमित शहांनी यापूर्वी गृहमंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे.
निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री व पहिल्या पूर्ण वेळ संरक्षणमंत्री ठरल्या. २०१७ ते २०१९ या कालावधीत संरक्षणमंत्री आणि त्यानंतर मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये अर्थमंत्री राहिलेल्या निर्मला सीतारामन यांनी ‘आंतरराष्ट्रीय अध्ययन’ या विषयावर एम. फिल. पूर्ण केले आहे.
एस. जयशंकर
विदेश नीतीतील अग्रेसर राजकारणी म्हणून सुब्रह्मण्यम जयशंकर अर्थात एस. जयशंकर यांचा विशेष नावलौकिक आहे. एस. जयशंकर यांनी जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१८ या कालावधीत भारत सरकारचे विदेश सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.
धर्मेंद्र प्रधान
धर्मेंद्र प्रधान हे माजी केंद्रीय मंत्री व वरिष्ठ भाजप नेते डॉ. देवेंद्र प्रधान यांचे चिरंजीव होय. नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे निकटवर्तीय व अतिशय विश्वासू ही धर्मेंद्र प्रधान यांची खास ओळख. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत प्रधान यांची कल्पक रणनीती वैशिष्ट्यपूर्ण ठरली होती.
जे. पी. नड्डा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, छत्तीसगड, तेलंगणा, केरळ, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांचे निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. कुशल रणनीतीकार म्हणून नड्डा यांनी खास ओळख प्रस्थापित केली आहे.
जीतन राम मांझी
बिहारच्या राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणजे जीतन राम मांझी. नितीश कुमार, चंद्रशेखर सिंह, बिंदेश्वरी दुबे, सत्येंद्र नारायण सिन्हा, जग्गनाथ मिश्रा, लालूप्रसाद यादव, राबडी देवी यांच्यासारख्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या राजवटीत त्यांनी बिहार राज्य सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली. जीतन राम मांझी हे नितीश कुमार यांचे निकटवर्तीय मानले जातात.
अश्विनी वैष्णव
अश्विनी वैष्णव राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांनी यापूर्वी २०२१ मध्ये रेल्वे मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांनी १९९१ मध्ये एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी आयआयटी कानपूरमधून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
चिराग पासवान
लोकजनशक्ती पक्षाचे खासदार चिराग पासवान आपल्या पक्षातच नव्हे, तर भाजपप्रणीत एनडीएमध्येही ते सक्रिय आहेत. कॉम्प्युटर सायन्सचे पदवीधर असलेले चिराग एक फॅशन डिझायनरही आहेत.
शिवराज सिंह चौहान
मध्य प्रदेशचे १९ वे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान १९७२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न राहिले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांची खास ओळख आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांनी चारवेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे.
सहा माजी मुख्यमंत्र्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या कार्यकाळातील आपल्या मंत्रिमंडळात सहा माजी मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली आहे. त्यात तीनदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले शिवराजसिंह चौहान, हरियाणाचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले मनोहर लाल खट्टर, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजनाथ सिंह, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा त्यात समावेश आहे. यातील चार भाजपचे तर दोन एनडीए आघाडीतील घटक पक्षाचे नेते आहेत, पंतप्रधान मोदीही यांनीही दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कारभार करून तिथे आपला ठसा उमटविला आहे.
कॅबिनेटपदी सीतारामन या एकमेव महिला
७२ जणांच्या मंत्रिमंडळात निर्मला सीतारामन या एकमेव महिलेकडे कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ६४ वर्षीय सीताराम यांचा २०१४ सालच्या मंत्रिमंडळातही सहभाग होता. त्यावेळी त्यांच्याकडे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाचा कार्यभार होता. २०१९ मध्ये त्यांच्याकडे केंद्रीय अर्थमंत्रिपदाची धुरा देण्यात आली. इंदिरा गांधी यांच्यानंतर अर्थमंत्रिपद सांभाळणाऱ्या त्या महिला महिला कॅबिनेट मंत्री ठरल्या.
१५ मंत्र्यांना पुन्हा संधी, मंत्रिमंडळात ७ नवे चेहरे
मोदी-३ सरकारमध्ये मोदी-२ सरकारमधील किमान १५ मंत्र्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. यामध्ये राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, जितेंद्र सिंह, राव इंद्रजित सिंग, मनसुख मांडवीय, किरेन रिजीजू, सर्वानंद सोनोवाल, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, अनुप्रिया पटेल, धर्मेंद्र प्रधान आदी मंत्र्यांचा समावेश आहे, शिवराजसिंह चौहान, जीतीन प्रसाद, सी. आर. पाटील, सुरेशी गोपी, बी. संजय, रणवीत सिंह, मनोहरलाल खट्टर यांच्यासह ७ चेहऱ्यांना मंत्रिमंडळात प्रथमच संधी मिळाली आहे.
हेही वाचा : 

अजित पवार भाजपचे गुलाम : संजय राऊत
गडकरींसह महाराष्‍ट्रातील ‘या’ नेत्‍यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ