विश्वासार्हता, पारदर्शकता हे पतसंस्थेच्या प्रगतीचे दोन खांब : शैलेश कोतमिरे

विश्वासार्हता, पारदर्शकता हे पतसंस्थेच्या प्रगतीचे दोन खांब : शैलेश कोतमिरे

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
पतसंस्थांच्या प्रगतीसाठी ठेवीदारांची विश्वासार्हता जपणे आणि आर्थिक बाबींची पारदर्शकता असणे हे दोन महत्त्वाचे खांब आहेत. आजच्या घडीला राज्यात आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. राष्ट्रीय बँका, खासगी बँका यांनी आधुनिकतेची कास धरली आहे, तरीदेखील गावागावांमध्ये असलेल्या पतसंस्थांनी आपले वेगळेपण टिकवत विकास केला आहे. राज्यात आजच्या घडीला साडेतेरा हजार पतसंस्था कार्यरत आहेत. आर्थिक स्थैर्य आणि बदलत्या काळात अद्ययावतता आणणे हे या पतसंस्थांपुढे आव्हान असणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांनी केले.
दै. ‘Bharat Live News Media’ आणि नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या सहकार महापरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सहकार विभागाचे माजी सहसंचालक डी. ए. चौगुले, मुंबई विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे, नाशिक विभागीय सहनिबंधक विलास गावडे, नाशिक जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी, तालुका उपनिबंधक संदीप जाधव, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे हेमंत फडके, फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट तथा प्रेरणा मल्टिस्टेट अर्बन को क्रेडिट सोसायटी (राहुरी) चे अध्यक्ष सुरेश वाबळे, रेणुकामाता को-ऑप. सोसायटी (अहमदनगर) चे अध्यक्ष प्रशांत भालेराव, महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी (पुणे) चे अध्यक्ष मगराज राठी, नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, दै. ‘Bharat Live News Media’ नाशिक आवृत्तीचे ब्युरो चीफ राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्घाटनपर भाषणात निमंत्रित पतसंस्थांना मार्गदर्शन करताना कोतमिरे म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरावर विविध कार्यकारी सोसायट्या स्थापन झाल्या. त्यांना निधी मिळावा, यासाठी जिल्हा सहकारी बँका अस्तित्वात आल्या. सहकारी बँकांना पुनर्निधीसाठी राज्य सहकारी बँका अशी त्रिस्तरीय रचना सहकार विभागाची आहे. या रचनेमुळे पतसंस्थांना बळकटी येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पतसंस्थांनी आर्थिक स्थैर्य टिकविण्यासाठी चालू खाते आणि बचत खाते यांचे प्रमाण नियमित कसे राहील, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचप्रकारे शासन स्तरावरून निश्चित केलेले आर्थिक निकष आपण पाळतो की नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. आर्थिक क्षेत्रात कर्जवाटप ही सोपी प्रक्रिया आहे. मात्र, त्या कर्जाची वसुली करणे ही अवघड बाब आहे. सध्या अनेक ठिकाणी सह. मजूर गट अस्तित्वात येत आहेत. त्यांना काही खासगी बँका कमी निधीचे कर्जवाटप करत असतात. पण या दिसायला जरी कमी असल्या, तरी त्यांचे वसुली प्रमाण १०० टक्के आहे. तसेच गटागटाने असल्यामुळे त्यांना फायदा होत आहे. तसेच व्यवस्थापन पतसंस्थांनी आणले पाहिजे, असे कोतमिरे यांनी निदर्शनास आणून दिले.
दै. ‘Bharat Live News Media’ने यापूर्वी राज्यात तसेच राज्याबाहेर अशा सहा महापरिषदा घेतल्या आहेत. नाशिकमध्ये त्याचा समारोप होत आहे. या परिषदांमधून आपल्याला आपल्या पतसंस्थेच्या विकासासाठी काय घेऊन जाता येईल, ते बघणे आवश्यक आहे. येथे उपस्थित सर्व पतसंस्थांमध्ये काही ना काही चांगले आहे. तेच आपल्याला वेचून घ्यायचे आहे. एकमेकांच्या अडचणी सोडवणे, त्यांना आधार देणे या बाबी या परिषदांमधून बाहेर येणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी दै. ‘Bharat Live News Media’ आणि नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दै. ‘Bharat Live News Media’ नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी, समाजातील विविध घटकांशी नाळ जोडलेल्या ‘Bharat Live News Media’ परिवाराच्या वतीने नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या सहकार्याने सहकार महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या या महापरिषदेत पतसंस्था विकासासाठी आणखी काय काय करता येईल. आपली पतसंस्था मजबूत करण्यासाठी जे जे काही करता येईल त्याची उत्तरे या महापरिषदेतून नक्की मिळतील असा आशावाद व्यक्त केला.
दीपप्रज्वलनाने या महापरिषदेचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी दैनिक Bharat Live News Mediaच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्जुन पाटील यांनी केले तर आभार संतोष धुमाळ यांनी मानले.
इतरांना बळ देण्याची पतसंस्थांमध्ये धमक : ढिकले
यावेळी नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील ढिकले यांनी रोजंदारीवर काम करणारे, जे तळागाळातील आहे, मात्र ज्यांना काम करून विकास साधायचा आहे. तसेच ज्यांना समाजात कमी पत आहे त्यांना पतपुरवठा करणे हा मूळ उद्देश आपल्या पतसंस्थांचा आहे. पतसंस्थांचा जीव जरी छोटा असला, तरी त्यांची धमक मोठी आहे. याचे नाशिकमध्ये दोन उदाहरणे आहेत. त्यामध्ये दिंडोरीतील कादवा साखर कारखाना आणि निफाडमधील रानवड साखर कारखाना हे दोन्ही कारखाने सध्या पतसंस्थाच चालवत असल्याचे त्यांनी सांगितले.
या पतसंस्थांचा समावेश
या महापरिषदेला महात्मा फुले नागरी सह. पतसंस्था मर्या. (चांदवड), कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (नाशिक), श्री गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (नाशिक), नाशिक रोड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (नाशिक रोड), नाशिक जिल्हा महिला व बचतगट विकास सह. पतसंस्था मर्या. (नाशिक), नामको पतसंस्था दि विजय अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. (नाशिक), श्री महारुद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (सातपूर), श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (देवळा), रघुनाथ हरी अमृतकार ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित (गुंजाळनगर, देवळा), जय मल्हार नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (नाशिक), श्री गोवर्धन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. (सोनांबे, सिन्नर), श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (डुबेरे, सिन्नर), एस. एस. के. धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नायगाव (सिन्नर), जय योगेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. (अक्राळे, दिंडोरी), मारुती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. (ओझर मिग, निफाड), स्व. शांतीलाल सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (निफाड, नाशिक), श्री धनलक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. (कळवण, नाशिक), दि सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (नाशिक), स्व. राजाभाऊ तुंगार ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. (शिंदे, नाशिक), सुदर्शन नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (नाशिक), गोविंदा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (मनमाड, मालेगाव) या पतसंस्थांचा समावेश आहे.
हेही वाचा:

राज ठाकरे महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत – संजय राऊत यांची खोचक टीका
‘डॅमेज कंट्रोल पार्ट-टू’साठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नाशिकमध्ये, विकासक, व्यापारी, उद्योजकांशी चर्चा
उमेदवारांचा जरा हटके प्रचार : सुटीचा रविवार लक्षात घेऊन मतदारांना घालतोय साद