8 कंपन्यांच्या बाजारमूल्यात 3 लाख 28 हजार कोटींनी वाढ

8 कंपन्यांच्या बाजारमूल्यात 3 लाख 28 हजार कोटींनी वाढ

टीसीएस, रिलायन्स आघाडीवर : सेन्सेक्स 2732 अंकांनी वधारला होता
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारामध्ये मागच्या आठवड्यामध्ये आघाडीवरील दहापैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 3 लाख 28 हजार कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे. मागच्या आठवड्यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या बाजार भांडवलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
7 जून रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स 2732 अंकांनी किंवा 3.69 टक्के इतका दमदार वाढीसह बंद झाला होता. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्सने 1720 अंकांच्या वाढीसह 76,795 अंकांची नवी विक्रमी झेप घेतली होती. मात्र त्यानंतर 76,693 या नव्या उच्चांकी विक्रमासह सेन्सेक्स निर्देशांक बंद झाला होता. वरील तीन कंपन्यांसोबत एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, आयटीसी या कंपन्यांच्या बाजार मूल्यातही चांगली वाढ झाली आहे तर दुसरीकडे नुकसानीत असणाऱ्या कंपन्यांमध्ये पाहता एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा त्यामध्ये समावेश होता. टीसीएसचे बाजारमूल्य 80 हजार 828 कोटी रुपयांनी वाढून 14 लाख 8 हजार 485 कोटी रुपयांवर राहिले होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 58,258 कोटी रुपयांसह  वाढत 6 लाख 5 हजार 407 कोटी रुपयांवर राहिले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 54 हजार 24 कोटी रुपयांसह 19 लाख 88 हजार 741 कोटी रुपयांवर पोहचले होते. यामध्ये भर घालताना इन्फोसिस कंपनीनेदेखील 52 हजार 770 कोटी रुपयांच्या वाढीसह 6लाख 36 हजार 630 कोटी रुपयांवर भांडवल पोहोचण्यात यश मिळवले आहे. एचडीएफसी बँकेच्या बाजार मुल्यात 32,241 कोटींची भर पडली असून 11,96,325 कोटींवर बाजार भांडवल मूल्य पोहचले होते.