राहुल गांधी पुन्हा वादात

राहुल गांधी पुन्हा वादात

कुलगुरू अन् शिक्षणतज्ञांनी विरोधात लिहिले पत्र
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा वादात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल यांनी विद्यापीठ प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकाराला विरोध करत आता अनेक विद्यापीठांच्या कुलगुरू तसेच माजी कुलगुरूंसमवेत 181 शिक्षणतज्ञांनी खुले पत्र लिहिले आहे. नियुक्ती प्रक्रियेसंबंधी ‘खोटा दावा’ राहुल गांधींनी केल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. तसेच काँग्रेस नेत्याच्या विरोधात त्यांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
कुलगुरुंची नियुक्ती पात्रतेऐवजी केवळ एखाद्या संघटनेशी संलग्नतेच्या आधारावर केली जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. तर शिक्षणतज्ञांनी राहुल यांचा हा आरोप फेटाळला आहेस. कुलगुरूंची निवड प्रक्रिया अत्यंत कठोर आणि पारदर्शक आहे. तसेच यात पात्रता, विशिष्ट विद्वता आणि निष्ठेचे मूल्य महत्त्वाचे ठरते. निवड प्रक्रिया पूर्णपणे शैक्षणिक आणि प्रशासकीय कौशल्यावर आधारित असून विद्यापीठांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून राबविली जात असल्याचे पत्रात म्हटले गेले आहे.
जेएनयूच्या कुलगुरु शांतिश्री पंडित, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरु योगेश सिंह आणि एआयसीटीईचे अध्यक्ष टी.जी. सीताराम समवेत विविध क्षेत्रांमधील शिक्षणतज्ञांनी पत्रावर स्वाक्षरी केली आहे. कुलगुरु निवड प्रक्रिया पूर्णपणे अकॅडमिक आणि प्रशासकीय कौशल्यावर आधारित राहिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विद्यापीठांमध्ये कुलगुरूंची नियुक्ती पात्रता तसेच अर्हता बाजूला ठेवत काही संघटनांसोबतच्या संबंधांच्या आधारावर केली जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याला अनेक कुलगुरू आणि शिक्षणतज्ञांनी विरोध केला आहे.
देशभरातील प्रतिष्ठित विद्यापीठांचे कुलपती आणि अकॅडमिक नेत्यांच्या निवड प्रक्रियेसंबंधी अलिकडेच करण्यात आलेल्या आधारहीन आरोपांना नाकारले जाते. तसेच राहुल गांधी यांनी या आरोपाकरता असत्याचा आसरा घेत अनेकांची बदनामी केली आहे. याचमुळे कायद्यानुसार त्यांच्या विरोधात योग्य कारवाई करण्यात यावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पत्रावर अनेक दिग्गजांची स्वाक्षरी
पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या दिग्गजांमध्ये सीएसजेएम विद्यापीठ कानपूरचे कुलगुरू विनय पाठक, पॅसिफिक विद्यापीठ उदयपूरचे कुलगुरू भगवती प्रकाश शर्मा, महात्मा गांधी ग्रामोद्योग विद्यापीठ चित्रकूटचे माजी कुलगुरू एन.सी. गौतम, गुरु घासीदास विद्यापीठ विलासपूरचे कुलगुरू आलोक चक्करवाल आणि आंबेडकर राष्ट्रीय कायदा विद्यापीठ सोनिपतचे माजी कुलगुरू विनय कपूर यांचा समावेश आहे.