6 कंपन्यांच्या मूल्यामध्ये 68 हजार 417 कोटींची घसरण

6 कंपन्यांच्या मूल्यामध्ये 68 हजार 417 कोटींची घसरण

भारती एअरटेल, रिलायन्स, एलआयसीचे भांडवल मूल्य घटले, एसबीआय, टीसीएसचे वाढले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील आघाडीवरच्या सहा कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये मागच्या आठवड्यात शेअर बाजारात 68 हजार 417 कोटी रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
यांच्या मूल्यात घसरण
यामध्ये दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल आणि भारतातील दिग्गज रिलायन्स इंडस्ट्रीज यांचा वाटा अधिक राहिला आहे. यांच्यासोबत लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इन्फोसिस, आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड यांच्या भांडवल मूल्यामध्येसुद्धा घसरण झाली आहे.
 यांचे मूल्य वाढले
पण दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या बाजार मूल्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 147 अंकांनी वाढला होता. 1 मे रोजी शेअर बाजार बंद होता.
 भारती एअरटेल तोट्यात
भारती एअरटेलचे बाजार मूल्य 27 हजार 635 कोटी रुपयांनी घसरून 7 लाख 23 हजार 770 कोटी रुपये झाले आहे. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 23 हजार 341 कोटी रुपयांनी घसरून 19 लाख 40 हजार 738 कोटी रुपयांवर खाली आले आहे. एलआयसीचे बाजार मूल्य 5724 कोटींनी घटून 6 लाख 19,217 कोटी रुपयांवर तर इन्फोसिसचे बाजार मूल्य 5686 कोटींनी घटून 5 लाख 87 हजार 949 कोटी रुपयांवर घसरले आहे. आयटीसीचे बाजार मूल्य 4619 कोटींनी घटून 5 लाख 44 हजार 645 कोटी रुपयांवर राहिले आहे.
 स्टेट बँकेचे मूल्य वाढले
स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल मात्र 26 हजार 907 कोटी रुपयांनी वाढले असून आता ते 7 लाख 42 हजार 126 कोटी रुपये झाले आहे. आयसीआयसीआय बँकेच्या बाजार मूल्यामध्येसुद्धा 24 हजार 651 कोटींची भर पडली असून यांचे बाजारमूल्य आता 8 लाख 2401 कोटी रुपये झाले आहे.