उचगाव महालक्ष्मी यात्रा 2025 साली घेण्याचा बैठकीत निर्णय

उचगाव महालक्ष्मी यात्रा 2025 साली घेण्याचा बैठकीत निर्णय

वार्ताहर /उचगाव
येथील 2025 साली महालक्ष्मी यात्रा भरविण्याबाबत उचगाव ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून पुन्हा गावातील नागरिकांची व्यापक बैठक बोलावून सर्वांची मते अजमावून निश्चित वर्ष ठरविण्यात येणार असल्याचे मंगळवार दि. 2 एप्रिल रोजी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. उचगाव गावामध्ये सन 2007 साली महालक्ष्मी यात्रा भरवण्यात आली होती. सदर यात्रा भरून 17 वर्षे पूर्ण होत आहेत. यासाठीच उचगावमध्ये लक्ष्मी यात्रा भरवण्याचा संकल्प ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. यासंदर्भात मंगळवारी मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये ग्रामस्थांची व्यापक बैठक बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम होते.  या बैठकीत बाळासाहेब देसाई, संभाजी कदम, रामा कदम, नारायण गडकरी, अशोक हुक्केरीकर, गणपती पावले, एन.ओ.चौगुले, बंडू पाटील, एल. डी. चौगुले यांनी लक्ष्मीयात्रेच्या संदर्भात येणाऱ्या विविध विषयांवर आपली मते मांडली. तसेच गावातील नागरिकांचीही मते आजमावण्यासाठी पुन्हा बैठक बोलविण्याचे यावेळी ठरविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बंटी पावशे, शरद होनगेकर, मधु जाधव, मनोहर कदम, मिथील जाधव, निळकंठ कुरबुर, चंद्रकांत देसाई यासह गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होती.
7 एप्रिल रोजी पुन्हा बैठक
सदर लक्ष्मीयात्रा भरविण्यासंदर्भात अजून बऱ्याच विषयांवर चर्चा करण्यासाठी म्हणून रविवार दि. 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये पुन्हा या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गावातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आपली मते बैठकीत मांडावीत, असे ग्रामस्थांतर्फे कळविण्यात आले आहे.