मेहबूबा मुफ्तींविरोधात एफआयआर

मेहबूबा मुफ्तींविरोधात एफआयआर

जम्मू-काश्मीरच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्या विरोधात आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी एफआयआर सादर केला आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पीडीपीच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेश मोडून आंदोलन केले होते. त्यामुळे ही तक्रार सादर करण्यात आली. पीडीपीने ही तक्रार चुकीची असल्याचे प्रतिपादन केले. लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आंदोलनाचा अधिकार आहे. अनंतनाग-राजौरी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात मतदान झाले होते. या मतदानाच्या आधी काही तास पीडीपीच्या शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती. प्रशासनाच्या या कृतीच्या विरोधात हे आंदोलन होते, असा दावा या पक्षाने केला आहे. असे आंदोलन केल्याने निवडणूक आचारसंहितेचा भंग कसा होतो, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, असे आव्हानही मुफ्ती यांनी दिले आहे.
प्रशासनावर घाबरविल्याचा आरोप
अनंतनाग-राजौरी मतदारसंघात अनेक ठिकाणी पीडीपीच्या मतदारांच्या वस्त्या आहेत. त्या वस्त्यांमध्येच ही कारवाई करण्यात आली होती. कारवाईला घाबरुन पीडीपीचे मतदार आपल्या घरांमधून बाहेर पडू नयेत आणि त्यांनी मतदान करु नये, या हेतूने ही कारवाई करण्यात आली. पीडीपीचा पराभव करण्यासाठी प्रशासनच पुढाकार घेत आहे, असा संशय यामुळे येतो. प्रशासनाची ही कृती लोकशाहीचा बळी घेणारी आहे, अशी टीका मेहबूबा मुफ्ती यांनी केली.
प्रशासनाकडून कारवाईचे समर्थन
निवडणूक काळात जमावबंदीचा आदेश मोडणे हा आचारसंहितेचा भंग असून नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. पीडीपीचे कार्यकर्ते मोठा जमाव करुन आंदोलन करीत होते. त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त मनुष्यबळ उपयोगात आणावे लागले. प्रशासनाने मतदान निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी 23 मे पासून 25 मे या दिवसाच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या संपूर्ण मतदारसंघात जमावबंदी आदेश लागू केला होता. त्यामुळे त्याचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक होते. पीडीपीने ते केले नाही, त्यामुळे कारवाई झाली, असे स्पष्टीकरण निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक प्रशासनाकडून बुधवारी करण्यात आले आहे.