म्यानमारमधून मणिपूरला अस्थिर करण्याचा प्रयत्न

म्यानमारमधून मणिपूरला अस्थिर करण्याचा प्रयत्न

एनआयएच्या आरोपपत्रात दावा : केंद्राला मिळाले इनपूट : उग्रवाद्यांकडून प्रतिबंधित संघटनांना मिळतेय मदत
वृत्तसंस्था /इंफाळ
म्यानमारमधून मणिपूरला अस्थिर करण्याचे प्रयत्न होत असल्याचे एनआयएने स्वत:च्या आरोपपत्रात नमूद केले आहे. सीमापार असलेले नागा बंडखोर गट दोन प्रतिबंधित मैतेई संघटनांना मदत करत असल्याचे इनपूट केंद्र सरकारला मिळाले होते. एनआयएने संबंधित आरोपपत्र आसाममधील न्यायालयात सादर केले आहे. चीन-म्यानमार मॉड्यूलच्या 5 आरोपींना मागील वर्षी जुलैमध्य अटक करण्यात आली होती. चीन-म्यानमार मॉड्यूल म्यानमारमधून संचालित होत असून नॅशनल सोशियालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडशी (एनएससीएन-आयएम) संबंधित आहे. चायना-म्यानमार मॉड्यूल भारतात घुसखोरी करण्यासाठी दोन प्रतिबंधित मैतेई संघटनांना मदत करत असल्याची कबुली अटकेतील आरोपींनी दिली असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आले.
6 दिवसांत 13 जणांचे अपहरण
राज्यात 8 ते 13 मेदरम्यान सुमारे 13 जणांचे अपहरण करण्यात आले आहे. अपहृतांमध्ये 4 पोलीस तर एक सीआरपीएफ जवान सामील आहे. अपहृत लोकांची खरी संख्या याहून अधिक असू शकते, कारण बहुतांश कुटुंबांकडून गायब झालेल्या लोकांविषयी पोलिसांकडे तक्रार नोंदविली जात नसल्याचे मणिपूरमधील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. मणिपूर पोलिसांनी अपहरणाच्या तक्रारींवर कारवाई करत 10 जणांना अटक केली आहे. यात मैतेई मिलिशिया ग्रूप अरामबाई तेंगगोलचे दोन सदस्य देखील आहेत. पूर्व इंफाळच्या कांगपोकपी जिल्ह्dयातील 4 पोलिसांचे अपहरण करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
पोलिसांचे अपहरण
अपहृत चारही पोलीस कर्मचारी हे मैतेई तसेच कुकी समुदायाचे सदस्य नव्हते. हे चारही जण कुकी सहकाऱ्याच्या घरातून काही सामग्री आणण्यासाठी गेले होतो. या घराला कुकी पोलीस कर्मचाऱ्याने मागील वर्षी दंगलीदरम्यान सोडून देत स्थलांतर केले होते. मैतेई संघटना अरामबाई तेंगगोलच्या सदस्यांनी पोलीस आल्याची माहिती मिळताच त्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांचा छळ करण्यात आला आणि त्यांची छायाचित्रे काढत ती व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये व्हायरल करण्यात आली आहेत.
आर्थिक स्थितीमुळे गुन्हे वाढले
मागील काही काळात राज्यात अपहरण आणि खंडणीवसुलीचे प्रकार वाढले आहेत. यामागे बेरोजगारी, कट्टरवादी गटासाठी शस्त्रास्त्र खरेदी किंवा कारवाया करण्यासठी पैशांची गरज अशी कारणे आहेत.  मागील एक वर्षात कुकी आणि मैतेई दोन्ही बाजूच्या संघटनांना लोकांना सुरक्षा पुरविण्याच्या नावावर पैसे मिळत राहिल आहेत. या पैशांमधून ते शस्त्रास्त्रs, ड्रोन यासारख्या गोष्टी खरेदी करत होते. परंतु राज्यात शांतता निर्माण होताच लोकांनी पैसे देणे बंद केले. याचमुळे खंडणीवसुली आणि अपहरणाच्या घटना वाढल्याचे सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद
मणिपूर हिंसेनंतर केवळ सर्वसामान्य लोकांमध्येच नव्हे तर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये देखील मैतेई आणि कुकी असे विभाजन दिसून येत आहे. कांगपोकपी जिल्हा हा कुकीबहुल असून तेथे मैतेई पोलीस कर्मचारी काम करत नाहीत. तर मैतेईबहुल भागांमध्ये जाणे कुकी पोलीस कर्मचारी टाळत आहेत. मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून सुरू झालेल्या हिंसेत आतापर्यंत 200 हून अधिक जणांनी जीव गमावला आहे. तर हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.