रत्नागिरी : …अखेर शिक्षक भरतीला मुहूर्त

रत्नागिरी : …अखेर शिक्षक भरतीला मुहूर्त

रत्नागिरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्हा परिषद शिक्षक भरतीला अखेर पुन्हा एकदा मुहूर्त मिळाला आहे. आता ही प्रक्रिया 20 व 21 मे रोजी होणार आहे. या भरती प्रक्रियेत पुन्हा विघ्न येवू नये, अशी इच्छा भरती पात्र उमेदवारांकडून केली जात आहे. समुपदेशनद्वारे 1 हजार 83 जणांना नव्या शाळा मिळणार आहे.
शिक्षक भरतीला लागलेलं ग्रहण सुटता सुटेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने ही भरती प्रक्रिया पुन्हा अडकली होती. मार्च महिन्यात शासनाने राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त जागांचा विचार करून पवित्र पोर्टलवरून भरती प्रक्रिया केली होती. जिल्ह्यात 1 हजार 83 जागांसाठी ही भरती प्रक्रिया होती. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मार्च महिन्यात ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. मात्र शाळांमधील रिक्त पदांवर नवीन शिक्षकांना नियुक्ती देण्यापूर्वी जिल्ह्यातील शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या कराव्यात, अशी मागणी संघटनांनी केली होती. याची दखल राज्य शासनाने घेतली.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पवित्र पोर्टलद्वारे निवडलेल्या नवीन उमेदवारांना रिक्त पदांवर शाळा देण्यासाठी समुपदेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यातच लोकसभेची आचारसंहिता सुरू झाली. निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय ही प्रक्रिया करता येणार नसल्यामुळे समुपदेशन पुढे ढकलण्यात आले व स्थगित करण्यात आले. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. त्यानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मार्गदर्शन पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झालं आहे. ज्या जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया होईल त्या तारखेनंतर ही बदली प्रक्रिया करावी, असे आदेश दिले आहेत. या आदेशाचा संदर्भ घेत समुपदेशन प्रक्रियेची तारीख निश्चित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. समुपदेशन तारीख निश्चित करून ही भरती प्रक्रिया होणार होती. मात्र समुपदेशनाबाबत विचार करत असतानाच अचानक पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता आयोगाने जाहीर केली होती. यामुळे पुन्हा शासनाने याबाबत मार्गदर्शन मागवले.
दरम्यानच्या काळात पदवीधरची निवडणूक पुढे गेल्याने आता या भरतीचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे. शासनाने त्यानुसार सोमवार व मंगळवारी दोन दिवस समुपदेशन ठेवले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4.30 वा. पर्यंत हे समुपदेशन असणार आहे. पहिल्या दिवशी 511 तर दुसर्‍या दिवशी 572 अशा 1 हजार 83 उमेदवारांना समुपदेशनद्वारे शाळा दिली जाणार आहे.
नियुक्त शिक्षक झाले होते आक्रमक
भरती न करण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेवर पात्र उमेदवारांनी आक्षेप घेत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेवर धडक दिली. कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने 20 मेच्या आधी आमचे समुपदेशन व्हावे, जूनमध्ये स्थायिक होण्यास अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर मार्चमध्ये समुपदेशनच्या तारखा जाहीर झाल्यामुळे खासगी क्षेत्रातील नोकरीचा राजीनामा अनेकांनी दिला आहे. यामुळे सध्या आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले होते.