तर पाकिस्तान अणुबाँब टाकेल !

तर पाकिस्तान अणुबाँब टाकेल !

लोकसभेची निवडणूक निम्म्याहून अधिक पार पडली असली तरी, अनेक नेत्यांची वादग्रस्त विधाने करण्याची सवय सुटलेली नाही असे दिसून येत आहे. प्रक्षोभक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा असेच एक विधान करुन काँग्रेसची कोंडी पेली आहे.
भारताने पाकिस्तानला मान दिला पाहिजे. कारण त्या देशाजवळ अणुबाँब आहे. जर कोणी वेडा त्या देशाचा प्रमुख बनला तर तो आपल्यावर अणुबाँब टाकू शकतो, असे विधान त्यांनी शुक्रवारी केले. या निवडणुकीच्या काळात आतापर्यंत मणिशंकर अय्यर यांचे अस्तित्व कोठे दिसून आले नव्हते. त्यांनी फारशी वक्तव्येही लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून केलेली नाहीत. मात्र, शनिवारी त्यांनी पहिल्यांदाच तोंड उघडले आणि पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे.
भाजपची संतप्त प्रतिक्रिया
अय्यर यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेस  आणि पाकिस्तान यांचे नाते किती प्रेमाचे आणि जवळीकीचे आहे, हे या वक्तव्यावरुन दिसून येते. तसेच या निवडणुकीत काँग्रेस पाकिस्तानकडून साहाय्य घेत आहे, हे अनेक उदाहरणांच्या वरुन दिसून आले आहे. भारताने पाकिस्तानसमोर नेहमी नमते घेतले पाहिजे. कारण त्या देशाजवळ अणुबाँब आहे. त्यामुळे त्या देशाला आम्ही घाबरले पाहिजे, असे अय्यर यांना सुचवायचे आहे, अशा अर्थाची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने सोशल मिडियावर व्यक्त केली.
काँग्रेसकडून परतफेड
या निवडणुकीत पाकिस्तानने सातत्याने काँग्रेसला समर्थन दिले आहे. पाक नेते राहुल गांधींची वारेमाप स्तुती करीत आहेत. या साहाय्याची परतफेड पाकिस्तानच्या अणुबाँबची भीती दाखवून मणिशंकर अय्यर यांनी केली. पण अय्यर यांनी लक्षात ठेवावे, की भारता आता पूर्वीसारखा लेचापेचा राहिलेला नाही. आपला देश गेल्या 10 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बळकट झाला असून आता त्याला पाकिस्तानच्या अणुबाँबला घाबरण्याचे कोणतेही कारण उरलेले नाही. भारतही शस्त्रसज्ज आहे. त्यामुळे त्या देशाने कोणतेही दु:साहस केल्यास तो जगाच्या नकाशावरुन पुसला जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते गिरिराज सिंग यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे धोरण उघड
पाकिस्तानला सुखावह वाटेल अशी विधाने करुन काँग्रेस आपले धोरण उघड करीत आहे. सियाचिनसारखा सामरिकदृष्ट्या महत्वाचा प्रदेश पाकिस्तानला देऊन टाकण्याचे धोरणही या पक्षाने अप्रत्यरित्या सूचित केलेले आहे, अशी प्रतिक्रिया केरळमधील थिरुवनंतपुरम येथील उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.