उत्तर प्रदेशात तृणमूल धोरणाचा डाव !

उत्तर प्रदेशात तृणमूल धोरणाचा डाव !

उत्तर प्रदेशात तृणमूल काँग्रेसचे धोरण लागू करण्याचे समाजावादी पक्षाचे कारस्थान आहे. विशिष्ट धर्माच्या लोकांचे लांगूलचालन करणे आणि दलितांचे, तसेच त्यांच्या महिलांचे शोषण करणे, हे या धोरणाचे महत्वाचे भाग आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील भदोही येथे केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रचारसभेत ते भाषण करीत होते. प्रारंभी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात गेल्या 10 वर्षांमध्ये करण्यात आलेल्या सामाजिक कामांची माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा, आर्थिक प्रगती, पायाभूत सुविधांची विक्रमी निर्मिती आदी विषयही हाताळले. नंतर त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.
विरोधी पक्ष भुईसपाट होणार
या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये भुईसपाट होणार आहेत, हे निश्चित आहे. विरोधी पक्षांनाही याची कल्पना आहे.  त्यामुळे त्यांनी लोकांमध्ये विविध विषयांवर भीती निर्माण करण्याचे डावपेच चालविले आहेत. सीएए सारख्या संरक्षक कायद्यासंबंधीही त्यांनी गैरसमज पसरविण्याची मोहीम हाती घेतली आहे. मतदार त्यांना पूर्णत: ओळखून असून भारतीय जनता पक्षाचाच मोठा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लांगूलचालनाचा विषारी बाण
विरोधी पक्षाचे नेते भगवान रामलल्लांच्या अयोध्येतील मंदिराला अपवित्र मानतात. पश्चिम बंगालमध्ये रामनवमी उत्सवावर बंदी घालण्यात आली. तेथे हिंदूंच्या हत्या होत आहेत आणि दलित तसेच वनवासी समाजांमधील महिलांवर अत्याचार केले जात आहेत. त्यांचे भूखंड आणि तुटपुंजी संपत्तीही हडप केली जात आहे. हेच ‘तृणमूल’ धोरण आहे. ते उत्तर प्रदेशात लागू करण्याचे कारस्थान समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने योजिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.