म्यानमारच्या विदेश मंत्र्यांसोबत जयशंकर यांची चर्चा

सीमेनजीकच्या हिंसेबद्दल चिंता व्यक्त : भारतीयांना मायदेशी पाठविण्याची मागणी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली म्यानमारमध्ये भारतीय सीमेला लागून असलेल्या क्षेत्रांमध्ये सातत्याने हिंसा घडत आहे. अशास्थितीत तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवरून भारताला चिंता सतावत आहे. याचदरम्यान विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी म्यानमारचे विदेशमंत्री यू थान श्वे यांची भेट घेतली आहे. या भेटीत भारताने म्यानमारमध्ये भारतीय सीमेनजीक सुरु असलेल्या हिंसेवर चिंता […]

म्यानमारच्या विदेश मंत्र्यांसोबत जयशंकर यांची चर्चा

सीमेनजीकच्या हिंसेबद्दल चिंता व्यक्त : भारतीयांना मायदेशी पाठविण्याची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
म्यानमारमध्ये भारतीय सीमेला लागून असलेल्या क्षेत्रांमध्ये सातत्याने हिंसा घडत आहे. अशास्थितीत तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवरून भारताला चिंता सतावत आहे. याचदरम्यान विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी म्यानमारचे विदेशमंत्री यू थान श्वे यांची भेट घेतली आहे. या भेटीत भारताने म्यानमारमध्ये भारतीय सीमेनजीक सुरु असलेल्या हिंसेवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच म्यानमारच्या म्यावाडे शहरात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यास सहकार्य करण्याची मागणी जयशंकर यांनी केली आहे.
जयशंकर यांनी म्यानमारचे विदेशमंत्री तसेच उपपंतप्रधान यू थानश्वे यांच्याशी चर्चा केली आहे. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या भारताच्या प्रकल्पांना सुरक्षा प्रदान करण्यावर जयशंकर यांनी या बैठकीत जोर दिला. जयशंकर यांनी खासकरून भारत-म्यानमार सीमेनजीक होत असलेल्या हिंसेवर चिंता व्यक्त केली आहे.
म्यानमारच्या अनेक क्षेत्रांमध्ये सैन्य (जुंटा) आणि बंडखोर गटांदरम्यान संघर्ष सुरू आहे. म्यानमारमध्ये बंडखोरांनी यापूर्वीच अनेक क्षेत्रांवर स्वत:चा कब्जा केला आहे. एप्रिल महिन्यात बंडखोरांनी जुंटाचा सैन्यतळ आणि म्यावाडी येथील कमांड केंद्रांवर कब्जा केला होता.
सर्व घटकांशी चर्चेची तयारी
म्यानमारमधील हिंसेच्या स्थितीला हाताळण्यसाठी भारत सर्व घटकांशी चर्चा करण्यास तयार असल्याचे या बैठकीत जयशंकर यांनी स्पष्ट केले. म्यानमारच्या सैन्याचे देशाच्या अनेक भागांवर कुठलेच नियंत्रण राहिलेले नाही. म्यानमारमधून होत असलेली अमली पदार्थांची तस्करी आता भारतासाठी मोठी समस्या ठरली आहे. तसेच मणिपूर येथील हिंसेत सामील गटांना म्यानमारच्या क्षेत्रातून रसद मिळत आहे.
म्यानमारमध्ये गृहयुद्धाची स्थिती
1 फेब्रुवारी 2021 रोजी म्यानमारमध्ये सत्तापालट झाला होता. सैन्याने निवडून आलेले सरकार उलथवून टाकत सत्ता स्वत:च्या हाती घेतली होती. तेव्हापासून म्यानमारमध्ये पुन्हा लोकशाही प्रस्थापित व्हावी म्हणून हिंसक निदर्शने होत आहेत. म्यानमारच्या रखाइन प्रांतासोबत अन्य क्षेत्रांमध्ये ऑक्टोबर महिन्यापासून सशस्त्र वांशिक समूह आणि सैन्यादरम्यान भीषण संघर्ष होत आहे. नोव्हेंबर महिन्यात भारत-म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये हिंसा तीव्र झाली होती. याचमुळे भारताकडून मणिपूर तसेच मिझोरमच्या सुरक्षेवरूनही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.