जंगलात मृतदेह ठेवण्याची अजब प्रथा

जंगलात मृतदेह ठेवण्याची अजब प्रथा

अंत्यसंस्कार करणे टाळतात, कारण विचित्र
जगात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याच्या अनेक प्रथा आहेत. यातील काही प्रथा चकित करणाऱ्या आणि भयावह देखील वाटतात. परंतु प्रत्येक प्रथेमागे एक रहस्य दडलेले असते, एक कारण असते. इंडोनेशियातील एक समुदाय स्वत:च्या स्वकीयांच्या मृतदेहांना दफन करत नाहीत तसेच अग्निसंस्कारही करत नाहीत. याऐवजी मृतदेह सडण्यासाठी जंगलात ठेवले जाते, परंतु यानंतर ते जे करतात ते अत्यंत विचित्र आहे. जगात अन्यत्र कुठेच अशाप्रकारे अंत्यसंस्कार करण्याची प्रथा नाही.
इंडोनेशियाच्या बाली बेटावर ट्रुनियन नावाचे गाव आहे. येथे राहणाऱ्या लोकांना बाली आगा, बलियागा किंवा बाली मुला बाली या नावाने ओळखले जाते. पर्वतांदरम्यान एकांतात राहणारे हे लोक ऑस्ट्रोनेशियन असून स्वत:च्या संस्कृतीसंबंधी कुठलीच तडजोड करत नाहीत. त्यांचे स्वत:चे नियम अन् कायदे आहेत. परंतु सर्वात खास त्यांची अंत्यसंस्काराची प्रथा आहे. बाली आगा समुदायाचे लोक मृतदेह सडण्यासाठी जंगलात सोडून देतात. परंतु त्यांची पुरेशी देखभालही करतात, मृतदेहांना बांबूच्या पिंजऱ्यात झाकून ठेवले जाते, जेणेकरून गिधाड आणि कावळ्यांनी त्याचे लचके तोडू नयेत. जर एखाद्या जीवाने या मृतदेहाचे लचके तोडले तर मृतांचा अपमान होईल असे त्यांचे मानणे असते.
मृतदेहांवरील मांस नष्ट झाल्यावर हे लोक कवटी आणि अन्य हाडं काढून आणतात आणि सजवून ठेवतात. तेथे एक जुना वृक्ष असून तो स्वत:च्या गंधाद्वारे या मृतदेहांची दुर्गंधी झाकोळून टाकतो. ट्रुनियन अंत्यभूमीत येणारे अनेक लोक याविषयी जाणून चकित होतात.
ट्रुनियन गावानजीक अशाप्रकारच्या तीन अंत्यभूमी ओत, परंतु केवळ एकच सर्वसाधारणपणे पर्यटकांसाठी खुली आडहे. येथे केवळ नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांचे मृतदेह ठेवले जातात. ज्या लोकांचा मृत्यू एखादी दुर्घटना किंवा आत्महत्येमुळे झाला असेल, त्यांचे मृतदेह तेथे आणले जात नाहीत. या मृतदेहांसाठी अन्य जागांची निवड केली जाते. मुलांना या अंत्यभूमीत प्रवेश नसतो. तेथे केवळ विवाहित लोकांचेच मृतदेह ठेवले जातात असाही दावा आहे.
देवता नाराज होऊ नये…
स्थानिक वदंतेनुसार बाली आगा लोक ज्वालामुखीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी मृतदेहांसोबत अशाप्रकारचे वर्तन करतात. ज्वालामुखीला हिंदू देवता ब्रह्माचे रुप मानले जाते. या देवतेला प्रसन्न करण्यासाठी अंत्यभूमीत 11 पगोडा निर्माण करण्यात आले आहेत. गावात एक मंदिर देखील आहे. अंत्यभूमी मृतदेहांनी भरून गेल्यावर सर्वात जुने मृतदेह हटविले जातात. तेथे मृतदेह ठेवण्याचे कार्य केवळ शुभदिनी होते. परिवाराला अंत्यसंस्कारासाठी पैसे जमवावे लागतात. काही मृतदेह तर अनेक दिवस किंवा आठवड्यांपर्यंत घरातच ठेवले जातात. कारण तेथे जागाच नसते, मृतदेह खराब होण्यापासून वाचविण्यासाठी त्यांच्यावर फॉर्मोल्डिहाइड गुंडाळले जाते.