काजू अपेक्षित दरापासून दूरच

काजू अपेक्षित दरापासून दूरच

उत्पादक शेतकरी चिंतेत : 80 रु. किलो दर
बेळगाव : गरिबांचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काजूला समाधानकारक भाव मिळत नसल्याने उत्पादकांतून चिंता व्यक्त होवू लागली आहे. मागील दोन वर्षांत अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसल्याने उत्पादक अडचणीत आले आहेत. कृषी खाते, बागायत खाते लोकप्रतिनिधींनी काजूला बाजारपेठ उपलब्ध करून योग्य हमी भाव द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक खानापूर तालुक्यात काजू उत्पादन होते. या पाठोपाठ बेळगाव आणि इतर ठिकाणी किरकोळ उत्पादन होते. अलिकडे नवीन रोप लागवडही वाढली आहे. त्यामुळे काजूचे क्षेत्रही वाढत असल्याने उत्पादनात भर पडू लागली आहे. मात्र उत्पादकांना अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसल्याने अडचणी येवू लागल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी काजूचा दर प्रतिकिलो 140 रुपयांच्या पुढे गेला होता. मात्र गतवर्षीपासून 80 ते 100 रुपयांपर्यंत स्थिर आहे. विशेषत: तालुक्याच्या पश्चिम भागात काजुचे क्षेत्र अधिक आहे. डोंगर आणि लालमाती असलेल्या भागात उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातही काजुला अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे खानापूर आणि बेळगाव तालुका काजू उत्पादनात आघाडीवर आहेत. मात्र काजू विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांना शेजारी असलेल्या चंदगड तालुक्यावरच अवलंबून रहावे लागते.
पूरक हवामानाअभावी उत्पादनात घट होण्याची शक्यता
यंदा काजुला पूरक हवामान नसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. इतर पिकांपेक्षा काजू उत्पादनाला खर्च नसल्यामुळे अलिकडे काजू लागवडीवर भर दिला जात आहे. मात्र काजुसाठी बाजारपेठ आणि योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे उत्पादकांना किरकोळ बाजारात मिळेल त्या दराला काजू विकावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटकाही बसू लागला आहे. दरवर्षी काजू हंगामाला प्रारंभ झाला की काजूच्या विक्रीचा प्रश्न उत्पादकांसमोर आवासून उभा राहतो. मात्र याबाबत कृषी खाते आणि बागायात खाते व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे दिसत आहे. एकीकडे शेतकऱ्याच्या पिकांना योग्य हमीभाव दिला जाईल, अशा घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात शेतकरी हमीभावापासून वंचित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे व्यापारी, दलाल यांच्याकडून शेतकऱ्यांची पिळवणूक कायम सुरू आहे.