उत्तर गोव्यात भाजप, दक्षिण गोव्यात काँग्रेस

उत्तर गोव्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे भाजपतर्फे सलग सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांचा एक लाख चार हजार मतांनी पराभव केला. उत्तर गोव्यात भाजपने कामगिरी उत्कृष्ट केली परंतु दक्षिणेतील पराभव पचविणे कठीण होऊन बसणार आहे. दक्षिण गोव्यात भाजपने पहिल्यांदाच नियुक्त केलेल्या महिला उमेदवाराला जनतेने स्वीकारले नाही. भाजपला त्याची […]

उत्तर गोव्यात भाजप, दक्षिण गोव्यात काँग्रेस

उत्तर गोव्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे भाजपतर्फे सलग सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांचा एक लाख चार हजार मतांनी पराभव केला. उत्तर गोव्यात भाजपने कामगिरी उत्कृष्ट केली परंतु दक्षिणेतील पराभव पचविणे कठीण होऊन बसणार आहे. दक्षिण गोव्यात भाजपने पहिल्यांदाच नियुक्त केलेल्या महिला उमेदवाराला जनतेने स्वीकारले नाही. भाजपला त्याची कारणमीमांसा शोधावी लागेल. मुळात दक्षिण गोव्यात ख्रिस्ती मतदारांची संख्या जास्त आहे आणि त्यांना मुस्लिम मतदारांनी चांगली साथ दिली. हिंदूंची पारंपरिक काँग्रेसची मते मिळाल्यानंतर काँग्रेसच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
गोवा राज्यात लोकसभेच्या केवळ दोनच जागा असल्या तरीदेखील राज्याच्या राजकारणावर अत्यंत परिणाम करणाऱ्या या जागा असल्याने या निवडणुकीवर साऱ्यांचे बारकाईने लक्ष होते. त्यातल्या त्यात दक्षिण गोव्याच्या निवडणुकीवर सर्वांची कडी नजर होती. ही जागा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी फार प्रतिष्ठेची होती, कारण दक्षिण गोव्यात भारतीय जनता पक्षाला पक्षश्रेष्ठींनी ‘सरप्राईज’ दिले होते. जी व्यक्ती भाजपची प्राथमिक सदस्यदेखील नव्हती, अशा एका उद्योगपतीच्या पत्नीला भाजपने थेट उमेदवारी दिली. हा प्रयोग यशस्वी होईल, अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठींनी केली होती. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीदेखील भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांना निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. काँग्रसमधून फुटून भाजपमध्ये आलेले काही आमदार यांचा तर भाजपला मुळीच उपयोग झाला नाही, हे या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
उत्तर गोव्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे भाजपतर्फे सलग सहाव्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप यांचा एक लाख चार हजार मतांनी पराभव केला. उत्तर गोव्यात भाजपने कामगिरी उत्कृष्ट केली परंतु दक्षिणेतील पराभव पचविणे कठीण होऊन बसणार आहे. दक्षिण गोव्यात भाजपने पहिल्यांदाच नियुक्त केलेल्या महिला उमेदवाराला जनतेने स्वीकारले नाही. भाजपला त्याची कारणमीमांसा शोधावी लागेल. मुळात दक्षिण गोव्यात ख्रिस्ती मतदारांची संख्या जास्त आहे आणि त्यांना मुस्लिम मतदारांनी चांगली साथ दिली. हिंदूंची पारंपरिक काँग्रेसची मते मिळाल्यानंतर काँग्रेसच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. दक्षिण गोव्यात सासष्टी हा असा एक तालुका आहे, ज्या ठिकाणी ख्रिस्तीबहुल मतदार हे नेहमीच काँग्रेसच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. या लोकसभा निवडणुकीत हे मतदार एकत्र आले आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी प्रचंड आघाडी काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस यांना मिळवून दिली. परिणामी भाजपला दक्षिण गोव्याच्या जागेला मुकावे लागले.
दक्षिण गोवा हा मतदारसंघ नेहमीच काँग्रेसच्या बाजूने राहिलेला आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस्को सार्दिन हे विजयी झाले होते. त्यांनी भाजपचा पराभव केला होता, मात्र यावेळी भाजपने कोणत्याही परिस्थितीत दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकणारच, या इराद्याने अथक प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर दोनवेळा या मतदारसंघात येऊन जाहीर सभा घेतल्या. तरीदेखील भाजपला या मतदारसंघात विजय मिळविणे शक्य झाले नाही. भारतीय जनता पक्षाने सासष्टीमधील ख्रिस्ती मतदारांची लॉबी मोडून काढण्यासाठी हिंदूबहुल मतदारसंघात केलेले प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. कारण दक्षिण गोव्यातील सांगे, केपे, फोंडा, केपे, मुरगाव या तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात हिंदू मतदारांनी मतदान केले नाही. इथे जर मोठ्या प्रमाणात आघाडी मिळाली असती तर कदाचित दक्षिण गोव्याचे चित्रदेखील बदलले असते आणि भारतीय जनता पक्षाला गोव्यात शंभर टक्के यश प्राप्त झाले असते. मात्र दक्षिण गोव्यात भारतीय जनता पक्षाला फार मोठा धक्का बसला आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच भाजपच्या बाजूने राहिलेला आहे. यापूर्वी तो मगो पक्षाबरोबर होता. या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बरोबर मगो पक्षाने देखील भरपूर काम केले. तरीदेखील भाजपला दक्षिण गोव्यात मिळालेले अपयश, हे पचविणे पक्षाला थोडे जड जाणार आहे.
या लोकसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आपल्या धोरणामध्ये बराच बदल करावा लागणार आहे. केंद्रात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार, हे आता नक्की झालेले आहे परंतु भाजपला केंद्रात स्वबळावर सत्ता मिळालेली नाही, इतर पक्षांचा टेकू घ्यावा लागणे, ही फार नामुष्की ओढविलेली आहे. त्यामुळे केंद्रात जरी पक्ष सत्तेवर असला तरी ही सत्ता पुढील पाच वर्षे टीकून राहील की नाही, याबाबत पक्षाच्या नेत्यांना शाश्वती नाही. मोठ्या प्रमाणात विकासकामे, असंख्य योजना राबविल्या. जगात अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रतिमा उंचावली. राम मंदिर उभारले आणि काश्मीरमधील 370 वे कलम देखील हटविले. एवढे असूनदेखील केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपला स्वबळावर सत्तेत येण्यास जनतेने मदत केलेली दिसत नाही. या पार्श्वभूमीवर गोव्याचा विचार करता उत्तर गोव्यामध्ये भाजपला सहज पद्धतीने व आजपर्यंत सर्वाधिक मताधिक्य मिळवून विजय मिळविता आला, मात्र दक्षिण गोव्यात हे चित्र नेमके उलटे झाले. गोव्यात पंतप्रधानांचा वरचष्मा जनतेवर राहिला नाही.
सागर जावडेकर