..तर आज दुष्काळाची तीव्रता नसती; जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
सांगली; Bharat Live News Media वृत्तसेवा : एप्रिल महिन्याची सुरुवात झाली असून यंदा पुरेसा पाऊस झाला नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याच्या टंचाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर सरकारला चांगलेच सुनावले आहे. वाटाघाटीसाठी दिल्ली – मुंबई करणाऱ्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले असते तर आज ही परिस्थिती नसती, असे म्हणत त्यांनी आज (दि.४) राज्य सरकारवर निशाणा साधला.
ते म्हणाले, सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी जरा इकडेही पहावे. सांगली, सातारा व सोलापूरमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. दिवसेंदिवस ही स्थिती बिकट होत चालली आहे. विहिरी – तलावांनी तळ गाठला आहे. सांगली जिल्ह्यात टँकरची मागणी १३% नी वाढली आहे. वारणा धरणात केवळ २३% पाणी शिल्लक आहे. एप्रिल महिन्यातच ही परिस्थिती आहे. तर मे मध्ये काय परिस्थिती असणार? मान, खटाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, सांगोला, मंगळवेढा या गावातील तलाव काही काळातच कोरडे पडणार आहेत. पाण्याविना जगायचं कसं? शेती करायची कशी? इतक्या गंभीर मुद्द्याकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. वाटाघाटीसाठी दिल्ली – मुंबई करणाऱ्यांनी आधीच धोरणात्मक निर्णय घेतले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, अशा कडक शब्दात त्यांनी सरकारचा समाचार घेतला.
Latest Marathi News ..तर आज दुष्काळाची तीव्रता नसती; जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा Brought to You By : Bharat Live News Media.