संगमेश्वरनगरात फायनान्स कंपनीला चोरांचा दणका

शटर तोडून 22 लाखांची रोकड लांबवली बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. पोलीस यंत्रणा निवडणूक बंदोबस्तात गुंतली आहे. त्यामुळे शहरात गुन्हेगार मोकाट सुटले असून संगमेश्वरनगर येथील एका फायनान्स कंपनीचे शटर तोडून सुमारे 22 लाख रुपये रोकड पळविण्यात आली आहे. सोमवारी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच […]

संगमेश्वरनगरात फायनान्स कंपनीला चोरांचा दणका

शटर तोडून 22 लाखांची रोकड लांबवली
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. पोलीस यंत्रणा निवडणूक बंदोबस्तात गुंतली आहे. त्यामुळे शहरात गुन्हेगार मोकाट सुटले असून संगमेश्वरनगर येथील एका फायनान्स कंपनीचे शटर तोडून सुमारे 22 लाख रुपये रोकड पळविण्यात आली आहे. सोमवारी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. खासकरून एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात तर गुन्हेगारांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. संगमेश्वरनगर येथील सी-कॉमर्स मार्केट सर्व्हिस लिमिटेड या फायनान्स कंपनीत चोरीची घटना घडली आहे. कंपनीच्या व्यवस्थापिका समृद्धी रितेश रणसुभे यांनी सोमवारी यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. शनिवार दि. 4 मे रोजी रात्री 9.30 ते सोमवारी 6 मे च्या सकाळी 11 या वेळेत चोरीची ही घटना घडली आहे. शनिवारी रात्री फायनान्सचे शटर बंद करून कर्मचाऱ्यांनी त्याला कुलूप लावले होते. चोरट्यांनी शटरला लावलेले कुलूप फोडून कंपनीतील 21 लाख 98 हजार 628 रुपये रोकड पळविली आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे शटर उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. तातडीने एपीएमसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक खाजा हुसेन, उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अगोदरचा शोध लागण्यापूर्वीच…
डॉलर्स कॉलनी, शाहूनगर येथील उद्योजक मनोहर येळ्ळूरकर यांच्या घराच्या पाठीमागील खिडकीची काच फोडून 25 लाख रुपये रोकड पळविल्याच्या घटनेला दोन महिने पूर्ण व्हायला आले. तरी याचा तपास लागला नाही. 9 मार्च रोजी सकाळी 11.45 ते दुपारी 12 यावेळेत ही घटना घडली होती. मोठ्या प्रमाणात रक्कम चोरीला गेल्याच्या घटनेचा सुगावा अद्याप लागला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कामकाजाबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ही मोठी घटना ताजी असतानाच फायनान्स कंपनीत चोरी झाली आहे.