चक्क महानगरपालिकेलाच टँकरचा आधार

पाणीटंचाईची समस्या गंभीर बनण्याची चिन्हे : नियोजनाची गरज : आगामी उन्हाळी महिने ठरणार तापदायक बेळगाव : शहरामध्ये पाण्याची समस्या निर्माण होत आहे. याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, खुद्द महानगरपालिकेलाच पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. सोमवारी टँकरद्वारे टाकीमध्ये पाणी सोडण्यात येत होते. यावेळी उपस्थितांमध्ये महानगरपालिकेच्या या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत होती. महापालिकेलाच जर पाणी […]

चक्क महानगरपालिकेलाच टँकरचा आधार

पाणीटंचाईची समस्या गंभीर बनण्याची चिन्हे : नियोजनाची गरज : आगामी उन्हाळी महिने ठरणार तापदायक
बेळगाव : शहरामध्ये पाण्याची समस्या निर्माण होत आहे. याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. मात्र, खुद्द महानगरपालिकेलाच पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. सोमवारी टँकरद्वारे टाकीमध्ये पाणी सोडण्यात येत होते. यावेळी उपस्थितांमध्ये महानगरपालिकेच्या या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत होती. महापालिकेलाच जर पाणी नसेल तर शहरातील जनतेला पाणी कोठून मिळणार? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होणार, हे निश्चित आहे. वळिवाचा पाऊस लवकर झाला नाही तर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या बेळगावासियांना भेडसावणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेने आतापासूनच पाण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी जनतेने केली आहे. याचबरोबर बैठकीमध्येही या विषयावर चर्चा झाली. एल अँड टी कंपनीकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, या कंपनीबाबत मोठ्या तक्रारी नोंद होत आहेत.
महानगरपालिका कार्यालयाला किमान नळजोडणी होणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी तरी पाण्याचा तुटवडा जाणवू नये. पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे टँकरने सोमवारी पाणी सोडण्यात येत होते. यावेळी जन्म-मृत्यू दाखल्यासाठी नागरिकांची लांबच्या लांब रांग देखील तेथे लागली होती. त्या रांगेत उभ्या असलेल्या सर्वच नागरिकांनी महानगरपालिकेलाच टँकर मागवावा लागला, हे पाहून तोंडात बोटे घातली. फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आगामी उन्हाळी महिने बेळगावकरांसाठी तापदायक ठरणार, असे दिसू लागले आहे. महानगरपालिकेने याबाबत आताच गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा बेळगावच्या जनतेला पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागणार आहे. महानगरपालिकेतच निर्माण झालेल्या पाणीटंचाईवरून जनता देखील आश्चर्य व्यक्त करत आहे.