जांबोटी-कणकुंबी भागातून अंजली निंबाळकरांना उत्स्फूर्त पाठिंबा

जांबोटी-कणकुंबी भागातून अंजली निंबाळकरांना उत्स्फूर्त पाठिंबा

खानापूर : खानापूर तालुका ही माझी कर्मभूमी असून मी माझ्या कर्मभूमीच्या विकासासाठी कोणत्याही त्यागाला तयार आहे. भाजपने लोकसभा कारवार मतदारसंघाचे 30 वर्षे दिल्लीत नेतृत्व केले. मात्र तालुक्याच्या विकासासाठी काहीच केलेले नाही. मी मात्र तालुक्याच्या विकासाचे ध्येय घेऊनच काम करत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच खानापूर तालुक्याला दिल्लीत नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे. यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने माझ्या पाठीशी उभे राहून भरघोस मतांनी मला निवडून द्यावे, आणि खानापूरचा झेंडा दिल्लीत रोवण्याचा मान मिळवून द्यावा, असे आवाहन कारवार लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांनी जांबोटी जिल्हा पंचायत क्षेत्रातील देवाचीहट्टी येथे झालेल्या सभेत व्यक्त केले. यावेळी व्यासपिठावर लक्ष्मण कसर्लेकर, महादेव घाडी, शामराव पाटील यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलानी अंजली निंबाळकर यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. जांबोटी जि. पं. विभागाच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच देवाचीहट्टी येथे पार पडली.
यावेळी महादेव घाडी यांनी अंजली निंबाळकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने खानापूर तालुक्याचा इतिहासात प्रथमच खासदारकीचा मान मिळणार आहे. यासाठी तालुक्यातील समस्त जनतेने राजकारण बाजूला सारुन तालुक्याला लोकसभेच्या मिळालेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहून अंजली निंबाळकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे आणि तालुक्यातून त्यांना मताधिक्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहूया. यावेळी सभेचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर म्हणाले, खानापूर तालुक्याला मिळालेल्या उमेदवारीच्या संधीचे सोने केले पाहिजे, यासाठी तालुक्यातील मतदारांनी अंजली निंबाळकर यांना उच्चांकी मताधिक्य देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे आणि अंजली निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहूया. तालुक्यातील सर्व महिलांनी अंजली निंबाळकर यांच्या पाठीशी रहावे, काँग्रेसच्या पाच गॅरंटी योजना तालुक्यातील प्रत्येक गावागावात पोहचल्या आहेत. जर पुन्हा काँग्रेसचे हात बळकट झाल्यास सामान्य जनतेला निश्चितच दिलासा मिळणार आहे. यासाठी अंजली निंबाळकर यांना लोकसभेत पाठवण्यासाठी आपण संकल्प करुया. याप्रसंगी जांबोटी जि. पं. विभागातील महिला आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.