रंकाळा, पंचगंगेच्या सुशोभिकरणावरच भर ! प्रदूषणमुक्त, संवर्धनाकडे महापालिकेचा कानडोळा, सुशोभिकरणाची कामेही निकृष्ट दर्जाची

रंकाळा, पंचगंगेच्या सुशोभिकरणावरच भर ! प्रदूषणमुक्त, संवर्धनाकडे महापालिकेचा कानडोळा, सुशोभिकरणाची कामेही निकृष्ट दर्जाची

कोल्हापूर प्रतिनिधी

महापालिकेकडून रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदीतील प्रदूषण रोखणे, संवर्धन करण्याकडे कानडोळा होत आहे. या उलट मिळालेल्या कोट्यावधीचा निधीचा वापर येथे सुशोभिकरणावरच केला जात आहे. विशेष म्हणजे सुरू असणारी कामेही निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप होत आहे.
रंकाळा तलावामध्ये आजही श्याम सोसायटीतील सांडपाणी मिसळत आहे. यामुळे च तलावाच्या पाण्यावर हिरवा तवंग आला आहे. एकीकडे ही स्थिती असताना शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा वापर मात्र, रंकाळा तलाव सुशोभिकरणावर खर्च केला जात आहे. तलावातील संध्यामठची दुरवस्था झाली आहे. तलावा भोवतीची सुरक्षा भिंत काही ठिकाणची कोसळली आहे. याकडे दुर्लक्ष करून मिळालेल्या 20 कोटी निधी सभोवतली सुशोभिकरण करण्यात घालवले जात आहे.
प्रधान्यक्रमाने करावी लागणारी कामे बाजूला ठेवून अशा प्रकार दुय्यम स्थान असणारी कामे करण्यातच महापालिका धन्यता मानत आहे. हीच स्थिती पंचगंगा नदीची आहे. नदीत अद्यापही शहरातील सांडपाणी मिसळत आहे. 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. असे असतानाच पंचगंगा घाट येथे सुशोभिकरणाला प्राधान्य दिले आहे. येथे करण्यात येणारी विद्युतरोषणाई सध्या चर्चेचा विषय बनली आहे. वास्तविक पंचगंगा घाटावर दरवर्षी पूराचे पाणी येते. तेव्हा येथील विद्युतरोषणाई काढून ठेवावी लागणार आहे. या कामाला नागरिकांकडून विरोध होत आहे.
नदी परिसराची कॉस्मेटिक सर्जरी
सुशोभिकरणाच्या नावाखाली हेरिटेजचे सर्व नियम उधळून लावत ऐतिहासिक पंचगंगा परिसराच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत नदी परिसराची केवळ कॉस्मेटिक सर्जरी करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी केला आहे. पैशाची उधळण आणि भ्रष्टाचार होत असल्याचेही आता येथील कामावरून बोलले जात आहे.
पावसाळ्यात संपूर्ण परिसर पाण्याखाली जातो. तरीही कोट्यावधी रुपयांच्या लाईटिंगच्या अट्टाहासाने पंचगंगा परिसराची वाट लावून ठेवली आहे. याच निधीचा घाटाची दुरुस्ती करणे तसेच नैसर्गिक सौंदर्य वृद्धींगत करण्याचे प्रयत्न करता आले असता. परंतू तसे झालेले नसल्याचेही शेख यांनी म्हटले आहे.