हिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाला हिंदूविरोधी संबोधताना हिंदूंचा द्वेष करणाऱ्या काँग्रेस पक्षाला हिंदुंना त्यांच्याच देशात दुय्यम दर्जाचे नागरिक बनवायचे असल्याचा आरोप त्यांनी केला. तेलंगणातील महबूबनगर लोकसभा मतदारसंघातील नारायणपेट येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हि टिका केली आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टिका केली. “काँग्रेसला हिंदू आणि हिंदू सणांचा तिरस्कार आहे. हे दररोज स्पष्ट होत आहे. ज्या काँग्रेस नेत्याने शहजादा (राहूल गांधी) ला शिकवले त्या नेत्यानेही अयोध्येत राम मंदिर बांधायला विरोध केला. राम मंदिराचे बांधकाम आणि रामनवमी साजरी करणे हे भारतविरोधी आणि भारताच्या कल्पनेच्या विरोधात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.” असे सांगताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शेहजादा असा टोमणा मारला.
पुढे बोलताना आपण राम मंदिरात गेल्यावर काँग्रेसने आपल्याला देशद्रोही म्हटल्याचही सांगितलं. काँग्रेस हिंदूंचा नेहमीच द्वेष करत आलेला असून हिंदूंना त्यांच्याच देशात दुय्यम दर्जाचे नागरिक बनवायचं आहे. या लोकांना भारतात औरंगजेबाची सत्ता स्थापन करायची आहे का ? आणि त्यामुळेच ते जिहादबद्दल बोलत आहेत का? ” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर धर्म आणि जातीच्या आधारे देशाचे विभाजन केल्याचा आरोप केला. देशाच्या हिताचा विचार न करता राजकीय फायद्यासाठी विशिष्ट समुदायांना संतुष्ट करणे हाच काँग्रेसचा खरा अजेंडा असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. “काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयां ऐवजी मुस्लिमांना धर्मावर आधारित आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. धर्मावर आधारित आरक्षण हे घटनाविरोधी आहे हे काँग्रेसलाही माहीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला होता हे देखील त्यांना माहीत आहे.” असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला.
हिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
3 months ago