लोकसभेच्या निकालाने भाजप विधानसभेसाठी सतर्क

नवी दिल्ली : सात टप्प्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला जाहीर झाले आणि पुन्हा एकदा ‘एनडीए’ सरकार सत्तेत आले. असे असले तरी भाजपसह एनडीएला अपेक्षित लक्ष्य गाठता आले नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. तो आकडाही यावेळेस भाजपला मिळवता आला नाही, ‘४०० पार’चे स्वप्न तर दूरच… परंतु या …

लोकसभेच्या निकालाने भाजप विधानसभेसाठी सतर्क

नवी दिल्ली :

प्रशांत वाघाये

सात टप्प्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला जाहीर झाले आणि पुन्हा एकदा ‘एनडीए’ सरकार सत्तेत आले. असे असले तरी भाजपसह एनडीएला अपेक्षित लक्ष्य गाठता आले नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. तो आकडाही यावेळेस भाजपला मिळवता आला नाही, ‘४०० पार’चे स्वप्न तर दूरच… परंतु या निकालातून धडा घेत भाजपने सावध पाऊल टाकायला सुरुवात केली आहे…
लो कसभा निवडणुकीच्या काही महिन्यांनंतर महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या चारही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीला अद्याप काही महिन्यांचा अवधी शिल्लक असला तरी भाजपने मात्र या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. चारही राज्यांसाठी भाजपने काही केंद्रीय मंत्र्यांसह पक्षाच्या प्रमुख नेत्यांना निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी पदी नेमले आहे. एवढेच नव्हे तर भाजपच्या मुख्यालयात संबंधित राज्यांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकांचा सपाटा देखील सुरू आहे. कोणत्या राज्यात कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, जे प्रश्न अडचणीचे ठरू शकतात ते प्रश्न सोडवण्यासाठी आतापासून काय करता येईल, ज्या गोष्टी लोकसभेत प्रतिकूल होत्या त्या गोष्टी विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी कशा अनुकूल करता येतील, जे घटक लोकसभा निवडणुकीत भाजपवर नाराज दिसून आले त्या घटकांना भाजपकडे पुन्हा कसे वळवता येईल, याचे नियोजन भाजपच्या वतीने केले जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल अशा काही राज्यांनी भाजपला म्हणावी तशी साथ दिली नाही. या राज्यांकडून भाजपला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र त्या पूर्ण होऊ शकल्या नाही. दरम्यान, भाजपला एनडीएसह बहुमत मिळाले असले तरी ते जसे भाजपला अपेक्षित होते तसे अजिबात नाही. त्यामुळे ज्या चुका लोकसभेत झाल्या त्या चुका कुठल्याही परिस्थितीत विधानसभेत होऊ नयेत, यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
विविध राज्यांमध्ये जबाबदाऱ्या वाटप करतानाही आवश्यक असल्यास नेतृत्वाचे विकेंद्रीकरण करण्याच्या तयारीत भाजप आहे. कुठल्याही परिस्थितीत आगामी विधानसभा काबीज करायच्याच, असा चंग भाजपने बांधला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सतर्क झाला आहे. आगामी काळात महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका आहेत. यापैकी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भाजपसह मित्र पक्षांचे सरकार आहे. या दोन्ही राज्यांमधील सरकार कायम ठेवणे आणि अन्य दोन राज्यांमध्ये सत्ता स्थापन करणे, हे भाजपचे लक्ष्य असणार आहे.
भाजपाला ‘या’ गोष्टींची चिंता ?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये सत्ता असूनही भाजपला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय समीकरण, त्यामुळे उद्भवलेले प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विरोधकांनी सरकारविरोधात तयार केलेले वातावरण तर हरियाणामध्येही सामाजिक समीकरणे, शेतकऱ्यांचे आंदोलन, त्यांची नाराजी आणि झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेली सहानुभूती, स्थानिक लोकांमध्ये असलेली नाराजी, त्यातच झारखंड लोकसभेत गमावलेल्या जागा अशा गोष्टींची चिंता भाजपला असू शकते. जम्मू-काश्मीरमध्ये सामाजिक समीकरणे, स्थानिक वातावरण या गोष्टींचा काहीसा विचार भाजपला करावा लागेल. मात्र, निवडणूक कुठलीही असो, भाजप ती निवडणूक पूर्ण ताकदीने आणि तयारीने लढते, हे उल्लेखनीय।