कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनची धुवाँधार सलामी

कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनची धुवाँधार सलामी

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळनंतर ‘रेड अलर्ट’ दिला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला. शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत सायंकाळनंतर मान्सून धुवाँधार बरसला. मुसळधार पावसाने कागल, गडहिंग्लज, इचलकरंजी आदी परिसरातील अनेक ओढे, नाले ओव्हरफ्लो झाले. त्यांचे पाणी रस्त्यांवरून वाहत होते.
काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. कागल तालुक्यातील बाळेघोल परिसरात पाण्यात ट्रॉली अडकली. कडगाव (ता. गडहिंग्लज) येथेही ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करावी लागली. आज, रविवारपासून जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात आजपासून अनेक भागांत दमदार पाऊस होईल, अशी शक्यता आहे.
शहरासह जिल्ह्यात सकाळी वातावरण काहीसे निरभ— होते. मात्र, नंतर ते ढगाळ होते गेले. दुपारनंतर त्याची तीव—ता वाढत गेली. सायंकाळी अनेक भागांत
पावसाला सुरुवात झाली. शहराच्या पूर्वेकडील भागात जोरदार पाऊस झाला. इचलकरंजी, पट्टणकोडोली, रुई, हुपरी आदींसह कागल, गडहिंग्जल तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसाने कागल तालुक्यातील कापशी-बाळेघोल ते हडलगे हा मार्ग ओढ्यावर पाणी आल्याने सुमारे चार तासांहून अधिक काळ वाहतुकीसाठी बंद होता. या परिसरातील रामपूरवाडी, हणबरवाडी, बेरडवाडी आदी परिसरातील ओढ्यांवरून पाणी वाहत होते. बाळेघोल परिसरात ओढ्याला आलेल्या पाण्यात ट्रॅक्टर-ट्रॉली अडकली. त्यातून ट्रॅक्टर बाहेर काढता आला. मात्र, ट्रॉली अडकली. अखेर दोरीने बांधून ती सुरक्षित ठेवण्यात आली.
जिल्ह्याला शनिवारी सायंकाळनंतर ‘रेड अलर्ट’ दिला होता. त्यानुसार शहरातही सायंकाळी सातनंतर पाऊस सुरू झाला. काही वेळात त्याचा जोर वाढला. पावसाने शहरातील जनजीवनावरही मोठा परिणाम झाला. दरम्यान, शनिवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 10 मि.मी. पाऊस झाला. सर्वाधिक पावसाची नोंद पन्हाळा तालुक्यात झाली. तिथे 19.2 मि.मी. पाऊस झाला. गडहिंग्लज तालुक्यात 1.7 मि.मी., शाहूवाडीत 12 मि.मी. पाऊस झाला. चंदगडमध्ये 11 मि.मी., गगनबावड्यात 14.8 मि.मी., आजर्‍यात 7.6 मि.मी., शिरोळमध्ये 11.7 मि.मी., हातकणंगलेत 12.6 मि.मी., करवीरमध्ये 7.3 मि.मी., कागलमध्ये 4.5 मि.मी., राधानगरीत 10.3 मि.मी., भुदरगडमध्ये 11.7 मि.मी. पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरात 3 मि.मी. पाऊस झाला.
इचलकरंजीत दाणादाण; घरांत पाणी
इचलकरंजी : इचलकरंजी शहर परिसरात शनिवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान धुवाँधार पावसाने हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांचा कडकडाट नसल्यामुळे उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. गणेशनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, दत्तनगरमधील नागरिकांच्या घरांत पाणी गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पाऊस इतका जोरदार होता की, अनेक छोटे नाले भरून वाहत होते. काही ठिकाणी गटारी तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर आले; तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या.
पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणी साचले होते. काही ठिकाणचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला होता. अनेकांनी पावसात भिजत प्रवास करण्याचा आनंदही लुटला. अनेक शाळा सुटल्यामुळे विद्यार्थ्यांना भिजत घरी जावे लागले. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर शहरातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर गर्दी दिसत होती.
गटारींतील पाणी, प्लास्टिक रस्त्यावर
पावसामुळे इचलकरंजी शहरातील अनेक ठिकाणच्या गटारी तसेच ड्रेनेज तुंबले होते. त्यामुळे रस्त्यांवर गटारीचे पाणी पसरले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. गटारींची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे गटारींतील प्लास्टिक कचरा रस्त्यावरून वाहत होता.
शहरातील कचरा नियमित उठाव होत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी वारंवार आहेत. पावसाळ्यामध्ये तासभर जरी पाऊस झाला, तरी अनेक भागांत दुर्गंधी पसरते. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने नियमित कचरा उठाव करून सारण गटारींची साफसफाई करणे गरजेचे आहे.
तासगाव परिसरात दमदार हजेरी
टोप : हातकणंगले तालुक्यातील तासगाव परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांना गती येणार आहे. गेले अनेक दिवसांपासून वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी हजेरी लावली असून, हा पाऊस खरीप हंगाम पूर्वमशागतीच्या कामांसाठी व पेरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
पेठवडगाव परिसरात तासभर पाऊस
किणी : पेठवडगाव व परिसरात सायंकाळी तासभर पाऊस झाला. या पावसाने बाजारपेठेत तारांबळ उडाली. मोठ्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पद्मा रोडवर पाण्याचे लोट आले, तर गटारी तुडुंब भरून वाहिल्या. काही ठिकाणी गटारी तुंबल्याने पाणी पुन्हा रस्त्यांवर आले. बियाणे तसेच खते खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रे तसेच वडगाव येथील कृषी सेवा केंद्रांवर गर्दी झाली होती.
व्हनाळी परिसरात समाधान
व्हनाळी : साके, व्हनाळी केंबळी, बेलवळे (ता. कागल) परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. धूळवाफ व रोहिणीचे पेरणीचे भात पावसाअभावी उगवले नसल्याने दुबार पेरणी करावी लागते की काय, या विवंचनेत बळीराजा होता; मात्र आज पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकरीवर्गात समाधान पसरले असून, भात उगवणी चांगली होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.
भुदरगड तालुक्यात शेतकरी सुखावला
गारगोटी : भुदरगड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. शनिवारी दुपारपासून पावसाने समाधानकारक सुरुवात केली. तालुक्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरूच होती. मुदाळ, कूर, वाघापूर, मडिलगे परिसरातील शेतकर्‍यांनी रोहिणीचा पेरा केला, तर तालुक्यातील उर्वरित कडगाव-पाटगाव, पिंपळगाव, मिणचे परिसरात म्हणावी तशी पेरणी झाली नव्हती. या पावसामुळे जमिनीमध्ये समाधानकारक ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकर्‍यांची धांदल उडणार आहे.
हमीदवाडा परिसरात दमदार बरसला
हमीदवाडा : परिसरात दुपारनंतर मृगाचा पाऊस दमदार बरसला. पेरणीला हा पाऊस चांगलाच पोषक असल्याने समाधान व्यक्त होत आहे. रोहिणीच्या मुहूर्तावर पेरणी झाली होती; मात्र त्यासाठी चांगल्या पावसाची गरज होती. जिथे पाणी द्यायची सोय आहे तिथे शेतकर्‍यांनी पाणी देण्यासदेखील सुरू केले होते. मान्सूनपूर्व पावसाची अधूनमधून हजेरी लागली होती; मात्र पेरणीनंतर मात्र तोही पाऊस नव्हता.
हिडदुग्गी परिसरात रस्त्यावर पाणी;
वाहतूक तासभर खोळंबली
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यामध्ये दमदार पावसाने शिवारात पाणीच पाणी झाले. हिडदुग्गी परिसरामध्ये झालेल्या पावसाने ओढ्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने या ठिकाणची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दुपारी तीननंतर हलक्या पावसाला सुरुवात झाली होती. चार वाजल्यानंतर मात्र पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत हा दमदार पाऊस पडल्याने शिवारामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र दिसून येत होते. पूर्वभागातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने या ठिकाणच्या ओढ्यांना पाणी येऊन हे पाणी रस्त्यावर आल्याने काही ठिकाणची वाहतूक काही वेळ खोळंबली होती. पावसाची संततधार रात्री उशिरापर्यंत सुरूच राहिल्याने काही ओढ्यांना मात्र पाण्याचा वेग वाढला होता.
हुपरीत आठवडी बाजारात दैना
हुपरी : हुपरीत विजांच्या कडकडाटासह झालेल्या पहिल्याच पावसाने येथील आठवडी बाजारात दैना उडाली. व्यापारी व बाजारकरू यांची धावपळ उडाली, तर शेतकरी व्यापारीवर्गाचे नुकसान झाले. बाजारपेठेत पावसाचे व गाटारीचे पाणी शिरल्यामुळे दुर्गंधी उडाली; तर धान्य, पालेभाज्या वाहून गेल्या. पावसामुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली. बाजारात भाजीपाला, फळ विक्रेते, धान्य विक्रेत्यांना फटका बसला. मुख्य बाजारात पावसाच्या पाण्याबरोबरच गटारीचे पाणी येत होते. या पाण्यातून वाट काढून जाताना व साहित्य, वस्तू सांभाळताना लोकांच्या नाकी नऊ आले. बाजारात पाणी शिरल्याने अनेकांचे धान्य व भाजीपाला वाहून गेला.