छत्रपती संभाजीनगर : कानडगाव येथे आग लागून तीन एकर ऊस जाळून खाक
कन्नड; Bharat Live News Media वृत्तसेवा : कानडगाव (क) येथे शेतकऱ्याच्या ऊसाला आग लागल्याची घटना बुधवारी (दि. २४) घडली. या घटनेत तीन एकर ऊस आणि एक एकरमधील शेडनेट जळून खाक झाले. यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कानडगाव (क) शिवारातील गट क्रमांक १३६ मध्ये पुरुषोत्तम नलावडे यांचा १२ महिन्याचा तीन एकर ऊस होता. तो ऊस त्यांनी कारखान्याला न देता रसवंतीसाठी ठेवला होता. सकाळी पुरुषोत्तम नलावडे हे जेवन करण्यासाठी घराकडे आले असता कुणीतरी अज्ञात व्यक्तीने या ऊसाला आग लावली.
आग लागल्याचे नागरिकांना दिसताच त्यांनी आरडाओरड केली. गावातून लोक आग विझण्यासाठी धावुन आले. विद्युत पंप चालु करून आग विझवण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु उन्हाचा तडखा व हवा ओघ मोठ्या प्रमाणात असल्याने आग विझवण्यासाठी नागरिकांचे प्रयत्न निष्फळ ठरले. आणि तीन एकर ऊस आणि एक एकरचे शेडनेट जळून खाक झाले.
सदरील आग कोणीतरी अज्ञात व्यक्तीने लावली असल्याचा संशय शेतकरी पुरुषोत्तम नलावडे यांनी व्यक्त केला आहे. हा ऊस १२ महिण्याचा झाल्यामुळे दोन दिवसात ४००० रुपये दराने हा ऊस गुजरात राज्यात रसवंतीसाठी जाणार होता. मात्र त्याआधीच हा प्रकार घडला. आता कारखान्याचा गळीत हंगाम संपला असल्याने ह्या ऊसाचे कराचे काय असा प्रश्न ह्या शेतकऱ्यांला पडला आहे. ऊसालगत पोखरा योजनेअंतर्गत पुरुषोत्तम नलावडे यांनी एक एकर मध्ये शेडनेट उभारलेले होते. त्यात एक एकर शेडनेटमध्ये टोमॅटोची लागवड करण्यात आली होती. हवा जोरात असल्याने काही मिनिटात आगीने शेडनेटमध्ये प्रवेश केला आणि काही मिनिटात एक एकरचे शेडनेट व शेडनेटमधील टोमॅटो देखील होरपळून खराब झाले.