‘प्लेऑफ’चे दरवाजे उघडण्यास ‘केकेआर’ सज्ज,

‘प्लेऑफ’चे दरवाजे उघडण्यास ‘केकेआर’ सज्ज,

आज मुंबईशी लढत
वृत्तसंस्था/ कोलकाता
फॉर्ममध्ये असलेले दोन वेळचे माजी विजेते कोलकाता नाईट रायडर्स आज शनिवारी त्यांच्या हंगामातील शेवटच्या घरच्या सामन्यात संघर्ष करणाऱ्या मुंबई इंडियन्सशी लढणार आहेत. तीन वर्षांत प्रथमच आयपीएलच्या प्लेऑफमधील स्थानावर शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने आज त्यांचा सारा प्रयत्न राहील. ‘केकेआर’ला दोन वेळा विजेतेपद पटकावून देणारा कर्णधार गौतम गंभीर संघाचा मार्गदर्शक म्हणून परतल्यानंतर या हंगामात संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
11 सामन्यांतून आठ विजयांसह 10 संघांच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर बसलेल्या केकेआरला आणखी एक विजय प्लेऑफमधील स्थानाची हमी देईल. शाहऊख खानच्या मालकीचा हा संघ आज घरच्या मैदानावरील म्हणजे ईडन गार्डन्सवरील मोहीम निश्चितच विजयाने संपवू पाहील. जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाचा टी-20 फलंदाज फिल सॉल्टसह सलामीवीर म्हणून सुनील नरेनला पाठविण्याचा गंभीरचा डाव हा मास्टरस्ट्रोक ठरला आहे. या दोघांनी मोठ्या प्रमाणात धावा केल्या आहेत, ज्यामुळे प्रथम फलंदाजी करताना आठपैकी सहा सामन्यांत संघाने 200 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत आणि पॉवर-प्लेमध्ये संघाला खूप फायदा झालेला आहे.

32 षटकारांसह नरेन अभिषेक शर्मानंतर (35) त्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. एक शतक आणि तीन अर्धशतकांसह त्रिनिदादच्या या खेळाडूने 183.66 च्या स्ट्राइक रेटने 461 धावा जमविल्या असून केकेआरतर्फे सर्वाधिक धावा केलेल्या आहेत. कमालीचे सातत्य त्याने दाखविले आहे. इंग्लिश खेळाडू सॉल्टने 183.33 च्या स्ट्राइक रेटने 429 धावा केल्या आहेत. या दोघांच्या स्फोटक फॉर्ममुळे फिनिशरच्या भूमिकेतील आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांना पुरेशी संधी मिळालेली नाही. तसेच नरेन व सॉल्टच्या कामगिरीने संघाच्या गोलंदाजीतील कच्च्या दुव्यांना, विशेषत: मिचेल स्टार्कच्या खराब गोलंदाजीला देखील झाकून टाकले आहे.
केकेआरच्या तिसऱ्या क्रमांकावरील तऊण अंगक्रिश रघुवंशी यानेही आपली योग्यता सिद्ध केली आहे, तर रमणदीप सिंग शेवटच्या षटकांत नेत्रदीपक ठरला आहे. याउलट पाचवेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केल्यानंतर बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. मागील सामन्यात त्यांनी सनरायझर्सवर मात केलेली असल्याने त्यांचे मनोबल थोडेसे वाढलेले असेल. आजच्या सामन्यातून आपली पत राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. सूर्यकुमार यादवला गवसलेला फॉर्म ही टी-20 विश्वचषकापूर्वी ‘टीम इंडिया’साठी चांगली बातमी आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या देखील फॉर्ममध्ये परततील अशी आशा टीम इंडियाचे चाहते बाळगून असतील.
संघ-कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत, रेहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रुदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा, चेतन साकारिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन, मुजीब उर रेहमान, गस अॅटकिन्सन, ए. गझनफर आणि फिल सॉल्ट.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवलिक शर्मा, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, हार्विक देसाई, नेहल वढेरा आणि ल्यूक वूड.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.