पान आणण्यासाठी गेला… नियतीने घात केला…

बडाल अंकलगी येथे भिंत कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू बेळगाव : मृत्यू केव्हा, कोठे, कोणासाठी दबा धरून बसलेला असतो याचा काही नेम नाही. तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो. याचा प्रत्यय बडाल अंकलगी येथे मंगळवारी सकाळी आला. पानसुपारी आणण्यासाठी दुकानाला जाणाऱ्या एका शेतकऱ्यावर भिंत कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. चन्नाप्पा मायाप्पा कुरबर (वय 55) असे ढिगाऱ्याखाली सापडून मृत्युमुखी […]

पान आणण्यासाठी गेला… नियतीने घात केला…

बडाल अंकलगी येथे भिंत कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
बेळगाव : मृत्यू केव्हा, कोठे, कोणासाठी दबा धरून बसलेला असतो याचा काही नेम नाही. तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो. याचा प्रत्यय बडाल अंकलगी येथे मंगळवारी सकाळी आला. पानसुपारी आणण्यासाठी दुकानाला जाणाऱ्या एका शेतकऱ्यावर भिंत कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. चन्नाप्पा मायाप्पा कुरबर (वय 55) असे ढिगाऱ्याखाली सापडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून उत्तरीय तपासणी करून चन्नप्पाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मंगळवार दि. 2 जानेवारी रोजी सकाळी 8.20 वाजण्याच्या सुमारास पानसुपारी आणण्यासाठी चन्नाप्पा किराणा दुकानाकडे जात होता. आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर इराप्पा हुक्केरी यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेतून जाताना शेजारची भिंत अंगावर कोसळली. या घटनेत चन्नाप्पा मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला. बडाल अंकलगी येथील जनता प्लॉट परिसरात चन्नाप्पाचे घर आहे. गावातील मूरमूक देवी गल्ली ओलांडून पानसुपारी आणण्यासाठी जाताना बसाप्पा अर्जुनवाडी यांच्या घराची भिंत कोसळून ही घटना घडली. पानसुपारी आणण्यासाठी घराबाहेर पडलेली व्यक्ती घरी परतली नाही, याचा कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.