सभेला खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचे सरकार येते!

बिहार निकालावरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका मुंबई ,प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएला 202 जागा मिळाल्या, तर महाआघाडीला केवळ 35 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. बिहार निवडणुकीच्या निकालावर आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे. बिहार निवडणुकीच्या निकालावर उद्धव […]

सभेला खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचे सरकार येते!

बिहार निकालावरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
मुंबई ,प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएला 202 जागा मिळाल्या, तर महाआघाडीला केवळ 35 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. बिहार निवडणुकीच्या निकालावर आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे.
बिहार निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आपले मुख्यमंत्री म्हणाले की ‘जो जीता वही सिकंदर’, पण सिकंदर बनण्यामागचे रहस्य आजपर्यंत कोणी समजू शकलेले नाही. बिहारच्या निवडणुकीत जे जिंकले त्यांचे अभिनंदन. पण, एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटते की तेजस्वी यादव यांच्या सभेला जो मिळणारा प्रचंड प्रतिसाद होता. मग तो प्रतिसाद खरा होता की एआयने तयार केलेली माणसे होती, हे आता कळेना. म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते, त्यांचे सरकार न येता ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात त्यांचे सरकार येते. या नवीन लोकशाहीतील हे गणित कळण्याच्या पलिकडचे आहे,’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
बिहारमध्ये अद्याप एनडीएचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर आलेला नाही, असा प्रश्न पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘हेच त्यांच्या (एनडीए) बहुमताचे एक गणित आहे. कारण आपल्याकडे महाराष्ट्रातही त्यांना (एनडीए) मोठे बहुमत मिळाले. पण तरीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडायला त्यांना काही कालावधी लागला. अशाच प्रकारचे बिहारमध्येही सुरू आहे. मग एवढे मोठे बहुमत मिळूनही अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला वेळ का लागतो? हे  सर्व स्पष्ट व्हायला पाहिजे’, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
भाजपला राष्ट्रगीत शिकवले पाहिजे
बिहारमध्ये महिलांना 10 हजार ऊपये देण्याच्या योजनेवर उद्धव ठाकरे म्हणाले की, हा एक फॅक्टर झाला. याचा कदाचित काहीसा फरक पडलाही असेल. पण तेथील लोक ज्या समस्या भोगत आहेत, ते एवढ्या लवकर बदलतील असे वाटत नाही. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘भाजप प्रादेशिक पक्ष संपवायला निघाले आहेत. भाजपला राष्ट्रगीत शिकवले पाहिजे. त्यामध्ये पंजाब, सिंध, महाराष्ट्र आहे. या प्रादेशिक अस्मिता मारायला भाजप निघाला आहे. अनेकतेत एकता आहे. ती एकता मारण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
आमचा पक्ष स्वतंत्र त्यांचा पक्ष स्वतंत्र
गेल्या काही काळापासून मुंबईत महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या समावेशावरून धुसफूस सुऊ आहे. मनसेच्या समावेशाला काँग्रेसचा विरोध असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने मुंबईत स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करताना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले आहेत, यावर बोलताना ठाकरे यांनी ‘आमचा निर्णय घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, तर त्यांचा निर्णय ते घेण्यास समर्थ आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.