आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा आजपासून
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा ही आतापर्यंतची सर्वांत मोठी स्पर्धा आहे, पण कदाचित सर्वांत जास्त राजकीय रंगाने माखलेलीही असून मैदानाबाहेरील नाट्यामय घडामोडींनी वादळी तयारीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधले आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेला आज शनिवारपासून भारत आणि श्रीलंकेतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुऊवात होत आहे. आणि जरी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या भारताला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी संभाव्य विजेते किंवा ज्या खेळाडूंकडे लक्ष ठेवले पाहिजे ते आतापर्यंत चर्चेचा विषय राहिलेले नाहीत.
स्पर्धेच्या तयारीच्या काळात राजकारण आणि खेळाचे अभूतपूर्व मिश्रण झाले आहे. ही स्पर्धा यावेळी 16 वरून 20 संघांपर्यंत विस्तारली आहे. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर त्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे आणि पाकिस्तानने त्यांना पाठिंबा म्हणून भारतासोबतच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. दोन्ही देशांनी या गोंधळासाठी भारताला जबाबदार धरले आहे. हा गोंधळ बीसीसीआयच्या सूचनेनुसार बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानला आयपीएल करारातून मुक्त केल्यानंतर सुरू झाला. बांगलादेशचा भारतात खेळण्यास नकार देण्यामागे रहमानला संघातून वगळणे हे देखील एक कारण होते, ज्यामुळे त्यांच्या ‘राष्ट्रीय अभिमानाला’ ठेच पोहोचली. परिणामी, शनिवारी कोलकाता येथे वेस्ट इंडिजविऊद्ध स्कॉटलंडचा संघ खेळणार आहे.
मोठ्या राजकीय चित्राकडे पाहून पाकिस्तानने चिखलात पाय घालून आपली एकता दाखवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे संपूर्ण नाट्या अधिकच गुंतागुंतीचे झाले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या निर्णयात उडी घेऊन त्याचे समर्थन केले आणि तो योग्य असल्याचे म्हटले. एकही चेंडू टाकण्यापूर्वीच आयसीसी आणि त्याचे प्रसारक संभाव्य नुकसानाच्या संकटाचा सामना करत आहेत, तर पाकिस्तान काही गंभीर निर्बंधांसाठी तयारी करत आहे, ज्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. जागतिक स्पर्धांमधील अलीकडील भारत-पाकिस्तान सामने बहुतेक वेळा एकतर्फी ठरले असले, तरी हा सामना अजूनही जागतिक क्रिकेट अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा कमाईचा स्रोत असतो हे नाकारता येत नाही. या नाट्यामय घडामोडींव्यतिरिक्त क्रिकेटवर भारताचे वर्चस्व राहील असे दिसते. किमान या स्वरुपात भारताच्या वर्चस्वाला आव्हान देण्याइतके दुसरे तुल्यबळ संघ आहेत की नाही याची खात्री नाही.
जर पाकिस्तानविऊद्धचा सामना अखेरीस प्रेमदासा स्टेडियमवर झाला, तर तो सामना भारतीय युवा फलंदाजांची एका आव्हानात्मक खेळपट्टीवर कसोटी घेईल, जिथे मोहम्मद नवाज, अबरार अहमद आणि अनपेक्षितपणे संघात स्थान मिळालेला साइड-आर्म गोलंदाज उस्मान तारिक यांना सर्वोत्तम संधी मिळेल. त्यामुळे सामना सोडल्यास भारतापेक्षा यात पाकिस्तानचेच अधिक नुकसान होईल. पाकिस्तान शनिवारी कोलंबोमध्ये नेदरलँड्सविऊद्ध आपल्या मोहिमेची सुऊवात करणार आहे, हा सामना ते जिंकतील अशी अपेक्षा आहे. एकूणच, गुणवत्ता आणि कामगिरीच्या बाबतीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताच्या तोडीचा कोणताही संघ नाही.
असे दिसते की, भारत प्रतिस्पर्ध्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नव्हे, तर केवळ स्वत:च्या चुकांमुळेच पराभूत होऊ शकतो. जर भारताने टी20 विश्वचषकाची ही आवृत्ती जिंकली, तर ती एक सामान्य गोष्ट मानली जाईल. पण जर ते हरले, तर तो एक मोठा धक्का असेल, कारण प्रत्येक खेळाडू सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, तो पाहता ही शक्यता कमी वाटते. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आहे, जो कोणत्याही परिस्थितीत नेहमीच एक बलाढ्या संघ असतो. परंतु पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्या अनुपस्थितीत बेन ड्वार्शुइस, झेवियर बार्टलेट आणि नॅथन एलिस यांचा समावेश असलेला गोलंदाजीचा ताफा कागदावर थोडा कमकुवत दिसतो. पण ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, कर्णधार मिचेल मार्श, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल आणि टिम डेव्हिड यांच्या फलंदाजीच्या फळीत मात्र एक जबरदस्त ताकद दिसते. दोन फिरकी गोलंदाज मॅट कुहनेमन आणि अॅडम झॅम्पा मोठ्या सामन्यांमध्ये कशी कामगिरी करतात, यावरही बरेच काही अवलंबून असेल.
इंग्लंडबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्याकडेही फलंदाजीला अधिक महत्त्व देणारी संघरचना आहे, ज्यात कर्णधार हॅरी ब्रूक, जोस बटलर, बेन डकेट आणि फिल सॉल्ट कोणत्याही गोलंदाजीच्या फळीला कडवी झुंज देण्यास सक्षम आहेत. पण वऊण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यासमोर ते कशी कामगिरी करतात यावरच संघाची मोहीम कोणत्या दिशेने जाईल हे ठरेल. दक्षिण आफ्रिका देखील उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी सर्वांत प्रबळ दावेदारांपैकी एक आहे आणि त्यांच्याकडे भारतापाठोपाठ दुसरी सर्वोत्तम गोलंदाजीची फळी आहे, ज्यात कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, मार्को जॅनसेन, केशव महाराज यांचा समावेश असून ते कोणत्याही मोठ्या संघाला आव्हान देण्यास सक्षम आहेत. फलंदाजीमध्ये क्विंटन डी कॉकची शैली, एडन मार्करमचा अनपेक्षित खेळ, डेव्हिड मिलरचा अनुभव आणि रायन रिकेल्टन व ट्रिस्टन स्टब्स यांचा आक्रमकपणा निश्चितपणे उपयुक्त ठरेल.
न्यूझीलंड हा नेहमीच चांगली कामगिरी करणारा संघ आहे आणि देशात एक महिना आधीच आल्यामुळे ते इतर संघांच्या तुलनेत लवकर येथील वातावरणाशी जुळवून घेतील. बिग बॅश लीग आणि भारताविऊद्धच्या शेवटच्या टी20 सामन्यातील कामगिरीनंतर फिन अॅलनचा आत्मविश्वास वाढलेला असेल. ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेलही चांगली कामगिरी करत असल्याने न्यूझीलंडची फलंदाजीची फळी खूपच चांगली दिसते. गोलंदाजीत लॉकी फर्ग्युसनचा वेग, जेकब डफीचे विविध प्रकारचे चेंडू आणि कर्णधार मिचेल सँटनरची चतुराई त्यांना सुपर एटमध्ये एक कठीण प्रतिस्पर्धी बनवते.
श्रीलंका, जो आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे, तो नेहमीच एक बलाढ्या प्रतिस्पर्धी राहिलेला आहे. त्यात फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा, महेश थीक्षाना, दुनिथ वेललागे आणि वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना, दुष्मंथा चमीरा यांचा समावेश आहे. ही 20 संघांचा समावेश असलेली पहिली टी-20 विश्वचषक स्पर्धा आहे आणि वेस्ट इंडिज त्यांच्या खास शैलीमुळे आणि स्वत:चेच नुकसान करून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेणारा संघ असेल. अमेरिकेच्या बाबतीतही तेच आहे, ज्या संघाला क्रिकेट जग विनोदबुद्धीने ‘युनायटेड स्टेट्स ऑफ एशिया’ असे म्हणते, कारण त्यात भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील परदेशी खेळाडूंची संख्या जास्त आहे. सहयोगी संघांमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकणारा संघ हा निश्चितपणे नेपाळ आहे, ज्यांच्याकडे दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे.
आजचे सामने
1) नेदरलँड्स वि. पाक
स्थान : कोलंबो, वेळ : स. 11 वा.
2) विंडीज वि. स्कॉटलंड
स्थान : कोलकाता, वेळ : दु. 3 वा.
3) भारत वि. अमेरिका
स्थान : मुंबई, वेळ : सायं. 7 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क,
जिओ हॉटस्टार अॅप
Home महत्वाची बातमी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा आजपासून
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा आजपासून
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा ही आतापर्यंतची सर्वांत मोठी स्पर्धा आहे, पण कदाचित सर्वांत जास्त राजकीय रंगाने माखलेलीही असून मैदानाबाहेरील नाट्यामय घडामोडींनी वादळी तयारीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधले आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेला आज शनिवारपासून भारत आणि श्रीलंकेतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुऊवात होत आहे. आणि जरी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या भारताला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार […]
