शिक्षण व्यवस्था आता माफियांच्या ताब्यात

नीटप्रकरणी सरकारवर बरसल्या प्रियांका वड्रा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांनी नीट-युजी समवेत राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततांवरून मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. सरकारने पूर्ण शिक्षण व्यवस्थेला माफिया आणि भ्रष्टांच्या हाती सोपविले असल्याचा आरोप वड्रा यांनी केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या कामकाजाची समीक्षा करणे आणि परीक्षा सुधारणांची शिफारस करण्यासाठी […]

शिक्षण व्यवस्था आता माफियांच्या ताब्यात

नीटप्रकरणी सरकारवर बरसल्या प्रियांका वड्रा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा यांनी नीट-युजी समवेत राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततांवरून मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. सरकारने पूर्ण शिक्षण व्यवस्थेला माफिया आणि भ्रष्टांच्या हाती सोपविले असल्याचा आरोप वड्रा यांनी केला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या कामकाजाची समीक्षा करणे आणि परीक्षा सुधारणांची शिफारस करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आल्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला होता. याच्या दुसऱ्याच दिवशी प्रियांका वड्रा यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.
केंद्र सरकारने शनिवारी एनटीएचे महासंचालक सुबोध सिंह यांना पदावरून हटविले आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-युजीतील अनियमिततांचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे.
नीट-युजीचा पेपर लीक झाला होता. तर नीट-पीजी, युजीसी-नेट आणि सीएसआयआर-नेट परीक्षा रद्द करण्यात आली. आज देशातील काही सर्वात मोठया परीक्षांची हीच स्थिती आहे. भाजपच्या शासनकाळात पूर्ण शिक्षण व्यवस्था माफिया आणि भ्रष्टांच्या नियंत्रणात गेल्याची टीका वड्रा यांनी केली आहे.
देशाचे शिक्षण आणि मुलांच्या भविष्याला काही अपात्र लोकांच्या हाती सोपविण्याचा राजकीय हट्ट आणि अहंकाराने पेपर लीक, परीक्षा रद्द होणे आणि कॅम्पसमधून शिक्षण गायब होणे तसेच राजकीय गुंडगिरी हीच आमच्या शिक्षण व्यवस्थेची ओळख ठरली आहे असे प्रियांका वड्रा म्हणाल्या.
भाजप सरकार एक परीक्षा देखील निष्पक्षपणे आयोजित करू शकत नसल्याची स्थिती आहे. भाजप सरकार युवांच्या भविष्यासाठी सर्वात मोठा अडथळा ठरले आहे. देशाचे सक्षम युवा भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात लढण्यात स्वत:चा मूल्यवान वेळ आणि ऊर्जा वाया घालवत आहेत. तर असहाय्य मोदी हे केवळ बघ्यांच्या भूमिकेत असल्याची टीका काँग्रेस नेत्याने केली आहे.