कावड यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट

राज्य सरकारने भाविकांची सुरक्षा सोपविली एटीएसकडे : अतिरिक्त सुरक्षा बल तैनात वृत्तसंस्था/ मुझफ्फरनगर उत्तर प्रदेशातील कावड यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाली आहे. या माहितीनंतर भाविकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने एटीएसच्या जवानांना सुरक्षेसाठी तैनात केले आहे. कावड यात्रेकरूंच्या सुरक्षेची जबाबदारी एटीएस कमांडोंकडे सोपवण्यात आली आहे. एसएसपी अभिषेक सिंग यांनी परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात […]

कावड यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट

राज्य सरकारने भाविकांची सुरक्षा सोपविली एटीएसकडे : अतिरिक्त सुरक्षा बल तैनात
वृत्तसंस्था/ मुझफ्फरनगर
उत्तर प्रदेशातील कावड यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाली आहे. या माहितीनंतर भाविकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने एटीएसच्या जवानांना सुरक्षेसाठी तैनात केले आहे. कावड यात्रेकरूंच्या सुरक्षेची जबाबदारी एटीएस कमांडोंकडे सोपवण्यात आली आहे. एसएसपी अभिषेक सिंग यांनी परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेऊन कमांडोना सुरक्षेबाबत सतर्क राहण्यास सांगितले.
कावड यात्रेबाबत पोलीस प्रशासन सतर्क आहे. त्याचबरोबर यात्रा यशस्वीपणे पार पडावी यासाठी शासन स्तरावरून पूर्ण गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. त्याच उद्देशाने एटीएस (अँटी टेररिस्ट स्क्वॉड) टीमही मुझफ्फरनगरला पाठवण्यात आली आहे. शनिवारी सकाळी लखनौहून आलेल्या एटीएसच्या पथकाने मुझफ्फरनगरमधील शिव चौकात तळ ठोकला. येथे एसएसपी अभिषेक सिंह यांनी टीममध्ये समाविष्ट असलेल्या जवानांना कावड यात्रामार्गाची माहिती देत त्यांना पूर्ण सतर्कतेने निरीक्षण करण्याचे निर्देश दिले.
यात्रेच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने दोन हजारांहून अधिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत. प्रत्येक दोन किलोमीटर अंतरावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशा धार्मिक तीर्थयात्रांमध्ये सहसा दहशतवादी हल्ल्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर एटीएसची टीम तैनात करण्यात आली आहे. एक कंपनी रॅपिड अॅक्शन फोर्स, 6 कंपनी पीएसी आणि एक फ्लड युनिट आधीच तैनात करण्यात आल्याचे एसएसपी अभिषेक सिंह यांनी सांगितले.
हरिद्वारमधून दररोज लाखो कावड भक्त गंगाजल घेऊन शिवमंदिरांकडे येत आहेत. मुझफ्फरनगरमध्ये त्यांची सर्वाधिक गर्दी असते. तसेच गाझियाबाद, बुलंदशहर, अलिगढ, गौतम बुद्ध नगर, मेरठ, हापूर येथूनही हजारो भाविक यात्रेत सहभागी होत असतात. याशिवाय हरियाणा राज्यातील विविध जिह्यांतील तसेच राजस्थान आणि दिल्लीतून शिवभक्त येतात.