केएल राहुलबाबत सस्पेन्स, बुमराह कमबॅकसाठी सज्ज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारत व इंग्लंड यांच्यातील पाचवा व शेवटचा सामना 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. यादरम्यान चौथ्या सामन्यापूर्वी बीसीसीआयने केएल राहुल 90 टक्के तंदुरुस्त असल्याचे सांगितले होते. पण आता तो उपचारासाठी लंडनला रवाना झाल्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात राहुलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. याशिवाय, चौथ्या सामन्यात विश्रांती घेतलेला जसप्रीत बुमराह कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. […]

केएल राहुलबाबत सस्पेन्स, बुमराह कमबॅकसाठी सज्ज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत व इंग्लंड यांच्यातील पाचवा व शेवटचा सामना 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. यादरम्यान चौथ्या सामन्यापूर्वी बीसीसीआयने केएल राहुल 90 टक्के तंदुरुस्त असल्याचे सांगितले होते. पण आता तो उपचारासाठी लंडनला रवाना झाल्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात राहुलच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. याशिवाय, चौथ्या सामन्यात विश्रांती घेतलेला जसप्रीत बुमराह कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ मंगळवारी रांची येथून चंदीगडसाठी रवाना झाला आहे. संघ व्यवस्थापनाने दोन मार्चपर्यंत सर्वांना चंदीगड येथे एकत्र येण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर तीन मार्च रोजी संघ धरमशाला रवाना होईल.
गतवर्षी केएल राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली होती, यामुळे  त्याच्यावर सर्जरी करण्यात आली होती. याच दुखापतीमधून राहुल अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. मांडीची दुखापत त्याला अद्याप सतावत आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याची दुखापत पुन्हा बळवाल्यामुळे उर्वरित तीन सामन्यात तो खेळू शकलेला नाही. केएल राहुलला रांचीत होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी 90 टक्के तंदुरुस्त मानले जात होते, परंतु चौथा कसोटी सामना संपल्यानंतरही तो पूर्णपणे बरा झालेला नाही. यामुळे बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी व्यवस्थापकांना त्याच्या दुखापतीचे पुनर्मूल्यांकन करावे लागले. चिंतेचे कोणतेही मोठे कारण नसले तरी काही सूज दिसून आली आहे. हा अहवाल राहुलवर इंग्लंडमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाठवण्यात आला असून 2 मार्चपर्यंत हा अहवाल मिळण्याची शक्यता आहे. याबाबत एका तज्ञाचा सल्ला घेण्यासाठी तो लंडनला गेला असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.

बुमराह कमबॅकसाठी सज्ज
जसप्रीत बुमराह धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात पुनरागमन करू शकतो. कारण बुमराहला चौथ्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. या मालिकेत बुमराहची आतापर्यंतची कामगिरीही उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 3 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. अशातच रजत पाटीदारचा खराब फॉर्म, केएल राहुलची दुखापत यामुळे धरमशाला कसोटी प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.