मोठी दुर्घटना टळली! पवन हंसचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले; सुदैवाने सर्व ७ प्रवासी सुखरूप
अंदमान-निकोबार: अंदमान आणि निकोबार बेटावर मंगळवारी सकाळी एक मोठा विमान अपघात होता-होता टळला. पवन हंस कंपनीचे एक हेलिकॉप्टर मायाबंदर येथे लँडिंग करण्यापूर्वीच समुद्रात कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये सात जण होते, मात्र सुदैवाने सर्वांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय हेलिकॉप्टर सेवा पुरवठादार ‘पवन हंस’च्या या हेलिकॉप्टरने मंगळवारी सकाळी पोर्ट ब्लेअरहून उड्डाण केले होते. हे हेलिकॉप्टर उत्तर अंदमानमधील मायाबंदर येथे उतरणार होते. सकाळी ९:३० च्या सुमारास लँडिंगची प्रक्रिया सुरू असताना, धावपट्टीपासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर असताना हेलिकॉप्टरचे नियंत्रण सुटले आणि ते थेट समुद्रात कोसळले.
बचावकार्याला वेग
हेलिकॉप्टर पाण्यात पडताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने धाव घेतली. या तत्परतेमुळेच मोठा अनर्थ टळला. पवन हंसच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स (एकूण ७ जण) हेलिकॉप्टरमध्ये होते. सर्व सातही जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. कोणालाही किरकोळ खरचटण्यापलीकडे इजा झालेली नाही.
“हा लँडिंग दरम्यान झालेला अपघात होता. तातडीने मदत मिळाल्यामुळे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत,” असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
झारखंडमधील दुर्घटनेच्या सावटाखाली दुसरी घटना
विशेष म्हणजे, कालच (सोमवारी) झारखंडच्या चतरा जिल्ह्यात एक भीषण विमान अपघात झाला होता. ‘रेडबर्ड एअरवेज’ची एअर अॅम्ब्युलन्स जंगलात कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेचा शोक ताजा असतानाच अंदमानमध्ये हा अपघात घडला. मात्र, येथील बचाव कार्यामुळे जीवितहानी टळल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
अपघाताचे कारण अस्पष्ट
हेलिकॉप्टर नेमके तांत्रिक बिघाडामुळे कोसळले की हवामानामुळे, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. संबंधित अधिकारी या प्रकरणाची अधिक चौकशी करत असून अपघातानंतरच्या सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या जात आहेत.
