सायबर सुरक्षेबाबत एकदिवशीय चर्चासत्र उत्साहात

मराठा-पायोनियर-तुकाराम या बँकांचा पुढाकार : अभ्यासक हेमंत देशमुख यांचे मार्गदर्शन बेळगाव : आपल्या ग्राहकांच्या पैशांची सुरक्षितता ही प्रत्येक बँकेची स्वत:ची जबाबदारी आहे. त्यामुळे बँकांनी आपले कर्मचारी आणि संचालक मंडळांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे, असा आदेश अलीकडेच आरबीआयकडून काढण्यात आला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन येथील मराठा बँक, पायोनियर बँक आणि तुकाराम बँक यांच्या संयुक्त विद्यमाने […]

सायबर सुरक्षेबाबत एकदिवशीय चर्चासत्र उत्साहात

मराठा-पायोनियर-तुकाराम या बँकांचा पुढाकार : अभ्यासक हेमंत देशमुख यांचे मार्गदर्शन
बेळगाव : आपल्या ग्राहकांच्या पैशांची सुरक्षितता ही प्रत्येक बँकेची स्वत:ची जबाबदारी आहे. त्यामुळे बँकांनी आपले कर्मचारी आणि संचालक मंडळांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे, असा आदेश अलीकडेच आरबीआयकडून काढण्यात आला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन येथील मराठा बँक, पायोनियर बँक आणि तुकाराम बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एकदिवशीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. रविवारी सकाळी 10 ते 4 या वेळेत मराठा सहकारी बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात पुण्याचे सायबर गुन्ह्याचे अभ्यासक हेमंत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. सायबर गुन्हे म्हणजे काय, त्यांचे प्रकार, त्यांचा कायदा आणि सायबर सुरक्षितता अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
इंटरनेटचा वापर दैनंदिन जीवनात अपरिहार्य बनला असला तरीही तो भरपूर वाढला आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारीही वाढली आहे. अलीकडेच झालेल्या सर्व्हेनुसार जगभरात डिजिटलायझेशन वाढले आहे. वीस ते पंचेचाळीस वयोगटातला ग्राहक स्वत:च्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मुक्तपणे करत आहे, असे सांगून आपली संवेदनशील, गोपनीय, महत्त्वपूर्ण माहिती आपण सोशल मीडियावर देऊ नये. आपले पॅन कार्ड, आधार कार्ड व पॅमिली फोटो आदी माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नये. आपले पासवर्ड दर 21 दिवसांनी बदलावेत, पासवर्ड 12 ते 14 पॅरेक्टरचे असावेत, ते सोपे व लगेच अंदाज करता येण्यासारखे असू नयेत, आपल्या जवळच्या माणसालाही पासवर्ड सांगू नये, आरबीआय सूचनांनुसार कार्यरत राहिल्यास सायबर गुन्हे टाळता येतील, असे ते म्हणाले.
सायबर गुन्हेगार बँक अकाउंट हॅक करण्यासाठी कोणत्या क्लृप्त्या वापरतात याची माहितीही त्यांनी दिली. सायबर हल्ला झाल्यास आपल्या नोंदणीकृत मोबाईलवरून 1930 नंबरला त्वरित कळवावे, सर्व कार्ड्स व अकाउंट्स ब्लॉक करावेत, अशी माहिती त्यांनी दिली. बँकांनी आयटी क्षेत्राशी वाहून घेतलेला एक कर्मचारी नेमण्याची, कर्मचाऱ्यांना वरचेवर प्रशिक्षण देण्याची आणि सायबर पॉलिसी ठरवून ती अंमलात आणण्याची तसेच दर वेळेला आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यासाठी बँकांनी काही रकमेची तरतूद करावी, अशी सूचना त्यांनी केली. त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. प्रारंभी मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविकात हेमंत देशमुख यांचा परिचय करून दिला. चेअरमन दिगंबर पवार यांनी स्वागत केले. त्यानंतर पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर व तुकाराम बँकेचे संचालक प्रदीप ओऊळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन देशमुख यांचे स्वागत केले. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन दिगंबर पवार यांनी, तर दीपप्रज्वलन हेमंत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड यांनी आभार मानले. यावेळी झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांनी भाग घेऊन शंकांचे निरसन करून घेतले.