एनडीए की इंडिया…कौल कुणाला?

एनडीए की इंडिया…कौल कुणाला?

लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी : 751 पक्षांच्या 8,360 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झाले. ही निवडणूक प्रक्रिया एकूण 43 दिवस चालली. आता मंगळवार, 4 जून रोजी गेल्या 80 दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. मंगळवारी सकाळी देशभरातील 543 पैकी 542 जागांवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जवळपास 12 वाजेपर्यंत सर्व जागांचे कल स्पष्ट होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल अपेक्षित आहेत. आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणीही 4 जून रोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. तसेच काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणीही होणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत 543 पैकी 542 जागांवर निवडणूक घेण्यात आली. यात एकूण 8,360 उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. गुजरातमधील सुरतमधून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मच्या मते, राष्ट्रीय पक्षाचे 1,333 उमेदवार, राज्य पक्षाचे 532, अपरिचित पक्षांचे 2,580 आणि 3,915 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली. 2019 मध्ये 7,928 आणि 2014 मध्ये 8,205 जणांनी निवडणूक लढवली होती.
लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक करताना दिसत आहेत. ‘चाणक्य’ने एक्झिट पोलमध्ये एनडीएला 400 पेक्षा अधिक जागांचा अंदाज वर्तवला आहे. तर, 13 एक्झिट पोलच्या सर्वेक्षणानुसार एनडीएला 365 तर ‘इंडिया’ला 145 जागा मिळण्याचे अनुमान जाहीर केले आहे. अपक्ष आणि इतर पक्षांना 32 जागा मिळू शकतात. तरीही यापूर्वीच्या म्हणजेच 2019 मध्ये जिंकलेल्या 303 जागांचा आकडा एनडीए पार करेल असे दिसून येत आहे. तथापि, मुख्य विरोधी पक्ष काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी आपल्या आघाडीला 295 जागा मिळतील, असा दावा केल्यामुळे संपूर्ण देशवासियांसह जगाचेही भारताच्या या निकालाकडे लक्ष लागलेले असेल.
सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ
मंगळवार, 4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले. पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजल्या जातील. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाईल. पोस्टल मतपत्रिका 2 श्रेणींमध्ये मोजल्या जातील. प्रथम लष्कर, निमलष्करी दलाचे जवान आणि अधिकारी यांच्या मतांची मोजणी केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात निवडणूक कर्तव्य बजावणारे कर्मचारी, अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची पोस्टल मतमोजणी होणार आहे. ही सर्व पोस्टल बॅलेट मते शेवटी ईव्हीएम मतांसह जोडली जातील.
अंतिम निकाल कधी येणार?
मतमोजणीच्या पहिल्या 4 तासानंतर म्हणजेच दुपारी 12 वाजेपर्यंत टेंड येण्यास सुऊवात होईल. दुपारी 2 वाजल्यापासून निकाल लागण्यास सुऊवात होईल. ईव्हीएम व्हीव्हीपीएटी, व्हीव्हीपीएटी स्लिप मोजणी आणि पोस्टल मतपत्रिका जोडल्यानंतर, अंतिम निकाल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्मयता आहे. मतदान जास्त झालेल्या किंवा उमेदवारांची संख्या जास्त असलेल्या मतदारसंघांमधील अंतिम निकाल जाहीर करण्यास अंतिम निकालासाठी रात्रीपर्यंतही प्रत़ीक्षा करावी लागू शकते. तसेच वेळप्रसंगी एखाद-दुसऱ्या जागेवर फेरमोजणीची मागणी झाल्यास गणती प्रक्रिया लांबली जाऊ शकते.