जयोऽस्तु ते श्रीमहन्‌मंगले शिवास्पदे शुभदे

जयोऽस्तु ते श्रीमहन्‌मंगले शिवास्पदे शुभदे । स्वतंत्रते भगवति त्वामहम् यशोयुतां वंदे ॥ स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं । आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥

जयोऽस्तु ते श्रीमहन्‌मंगले शिवास्पदे शुभदे

Veer Savarkar

जयोऽस्तु ते श्रीमहन्‌मंगले शिवास्पदे शुभदे ।

स्वतंत्रते भगवति त्वामहम् यशोयुतां वंदे ॥

स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभेमाजीं ।

आम्ही गातसों श्रीबाजीचा पोवाडा आजी ॥

चितूरगडिंच्या बुरुजानो त्या जोहारासह या ।

प्रतापसिंहा प्रथितविक्रमा या हो या समया ॥

तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई ।

निगा रखो महाराज रायगड की दौलत आयी ॥

जरिपटका तोलीत धनाजी संताजी या या ।

दिल्लीच्या तक्ताचीं छकलें उधळित भाऊ या ॥

स्वतंत्रतेच्या रणांत मरुनी चिरंजीव झाले ।

या ते तुम्ही राष्ट्रवीरवर या हो या सारे ॥

लोट धुळीचा सुटला अवचित दीन शब्द उठला ।

लगट करुनि शिद्दिनें पन्हाळा गड वेढुनि धरिला ॥

लक्ष्मीचे मृदु कमल शारदासुंदरिचा वीणा ।

स्वतंत्रतेचा कलिजा अडके गडांत शिवराणा ॥

अफझल्याच्या वधा स्मरोनी फाजल सुत त्याचा ।

करितो पण कीं शिवभूपाला जिवंत धरण्याचा ॥

बापासि तुझ्या जो खडे । चारि रोकडे । जाशि त्याकडे ।

जीवंत धरुं तरि साचा ।

जीवंत पवन धरण्याचा ।

अभ्यास आधिं कर याचा ।

खुशाल हरिणा मग तूं धावें धरण्या वणव्याला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

बाजि लागला शिवभूपाच्या थोडा कानाला ।

हातीं भाला एक मावळा गडाखालिं आला ॥

शिद्दि पाहतां चुकुनि हात तरवारीला गेला ।

दाबुनि त्याला मुजरा केला धीट नीट वदला ॥

शिवाजि राजा जिवंत येतो तुमच्या गोटाला ।

उद्यां सकाळीं करुं गड खालीं कळवी तुम्हांला ॥

ऐकुनी शिद्दि बहु फुगला । रिपूजन भुलला । परस्पर वदला ।

अजि खान, खानखानाजी ।

हुए शिकस्त मराठे आजी ।

फिर लढना क्यौंकर आजी ।

चलो शराब उडायें ताजी ।

आप लेवजी, नहीं आप लेवजी ।

आप गाजि आप तो रणगाजी ।

झिंगविला अरि सर्प फुंकुनी पुंगी गुंगविला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

गुंगवुनी अरि-सर्प शिवा गारुडी गडावरि तो ।

प्रहर रात्र उलटतां मराठी जादू मग करितो ॥

कृष्णपक्षिच्या काळ्या काळ्या रात्रीं त्या दडल्या ।

गर्द झाडिला भिउनि चांदण्या बाहेरि न पडल्या ॥

अशा तमीं किलकिलें दार का तटावरी झालें ।

बाजि निघाले श्री शिव आले आले शत भाले ॥

भाला खांद्यावरी मराठा घोडयावरि स्वारी ।

भरतां घोडा थै थै नाचे तोंचि शीळ झाली ॥

वीर हो टाच घोडयाला । बाण हा सुटला । हटविणें त्याला ।

रिपु तुडवित व्हा व्हा पार ।

चौक्यासि तुम्हा दावील ।

काजवा चोर कंदील ।

गेला गडतळ गेला सत्तर मैल भूप आला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

तुरी शिद्धिच्या हातीं देउनि सुटता शिवनृपती ।

‘अब्रह्मण्यम्’ कितिक भाबडीं भोळिं भटें वदतीं ॥

अब्रह्मण्यम् यांत कायरे दोष कोणता तो ।

आला ठक ठकवाया उलटा भला ठकविला तो ॥

साप विखारी देश-जननिला ये घ्याया चावा ।

अवचित गांठुनि भुलवुनि ठकवुनी कसाही ठेचावा ॥

ये यथा प्रपद्यंते माम् । भजाम्यहं तान् । तथैव; श्रीमान् ।

भारतीं कृष्ण वदला हें ।

अधमासि अधम या न्यायें ।

रक्षिलें राष्ट्र शिवरायें ।

राष्ट्ररक्षका सावध रे रिपु हुडकित तुज आला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

हात जोडितों पाया पडतों बाजि तुझ्या राया ।

गड अवघड रांगणा तिथें तुम्ही जाणें या समया ॥

राष्ट्रदेविचा हस्त कुशल तूं तरि लाखों भाले ।

अम्हासारिखे मिळतील; चिरतिल चरचर रिपु सारे ॥

जाऊं काय मी बाजि मृत्युमुखिं ढकलुनि तुम्हाला |

कधीं शिवा जातिचा मराठा मृत्यूला भ्याला ॥

चढा गड तुम्ही यशोदायिनी तोफ पांच करा ।

तोंवरि लढवूं गनीम अडवूं खिंड करुं निकरा ॥४॥

वसुदेव तूंचि शिवराया । कंस कपटा या । करुनियां वाया ।

स्वातंत्र्य-कृष्ण-चिन्मूर्ती ।

जा घेउनि अपुल्या हातीं ।

गड गोकुळांत नांदो ती ।

गडीं चालला शिव तो खिंडित ‘दीन’ शब्द उठला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

आले आले गनीम खिंडिंत चवताळुनि आले ।

झाले झाले सज्ज मराठे सरसावुनि भाले ॥

संख्या दुप्पट रिपुची, परि ते निकरानें लढती ।

हर हर गर्जुनि समर रंगणीं तुटोनियां पडती ॥

खङगाचे खणखणाट त्या मधिं शर सणसण येती ।

मारण मराणावीण नेणती वीर रणीं रंगती ॥

तो हर हर एकचि झाला । वदति रे चला । म्लेंछ हा हटला ।

चला चढवा नेटाचा हल्ला ।

वीरश्रीचा करा रे हल्ला ।

निकराचा चालु द्या हल्ला ।

मारित हाणित हटवित म्लेंछा खिंडिपार केला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपुवरी घाला ॥

म्लेंछ हटवितां बाजी वळुनी गडाकडे पाहे ।

श्री शिव चाले मागे बघुनियां वीर गर्जताहे ॥

गडांत जाईल राष्ट्रदेविचा जिवलग शिवराणा ।

तोंवरि लढवूं खिंड शूर हो हा अपुला बाणा ॥

त्या बाण्याच्या आधिं रणांगणि जरी घडे मरणें ।

पुनर्जन्म घेउनी तत्क्षणीं पुनः पुन्हा लढणें ॥

रघुराया रावणहरणा । कंसमर्दना । भो जनार्दना ।

लाडक्या देश जननीचे ।

स्वातंत्र्य रक्षणीं साचे ।

हे प्राण दान जरि अमुचे ।

पवित्र हे जरि त्वत्प्रिय हे जरि दे तरि सुयशाला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

आले आले गनीम चालुनि पुनरपि तों आले ।

झाले जाले सज्ज पुनरपी उठावले भाले ॥

दीन दीन रण शब्दा हर हर महादेव भिडला ।

भिडला ओष्ठीं दंत मस्तकीं खङग वक्षिं भाला ॥

हल्ला चढवित परस्परावरि पुनः पुन्हा लढती ।

नटती योद्धे समरभाजनीं वीररसा लुटिती ॥

कचरला मराठी भाला । बाजि तों आला ।तोलुनी धरिला ।

रणिं रंग पुन्हा ये साचा ।

गर्जती मराठे रिपुचा ।

घ्या सूड म्लेंच्छ मत्तांचा ।

त्याचा मस्तक चेंडू साचा ।

समररंगणीं चेंडूफळीचा डाव भरा आला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

डाव उलटला म्लेंच्छावरी तो पुन्हा परत हटला ।

जय झाला परि वीर मराठा बहुतांशी पडला ॥

तिकडे गडिंच्या तोफा अजुनी पांच कां न सुटती ।

वीर मराठे सचिंत आशाबद्ध सर्व बघती ॥

तशांत घेउनि ताजी टोळी फाजलखां येतो ।

धन्य बाजिची; पुन्हा उसळुनी अशनी सम पडतो ॥

खिंड तोफ तिज मधुनी सुटला गोळा श्री बाजी ।

रणीं तळपतो वीरश्रीचा रणनवरा बाजी ॥

तों गोळी सूं सूं आली । अहो त्या काली । मर्मिं ती शिरली ।

श्री बाजी विव्हळ पडला ।

मागुती तत्क्षणी उठला ।

बेहोष वीर परि वदला ।

तोफे आधीं न मरे बाजी सांगा मृत्यूला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

थांबा बाजी जखम तरि पुरी बांधूं द्या थांबा ।

हर हर रणिंचा ऐकुनि वीरा उसळुं नका थांबा ॥

जखम कुठें रे असे फक्त मी तृषाक्रांत थोडा ।

रिपुरक्ताते पितों घटघटा सोडा मज सोडा ॥

खरी जखम भू-आईस माझ्या, फोडी हंबरडा ।

ओढुनि अरिची अंतडी बांधुया पट्टि तिला सोडा ॥

भले मराठे लढा तसेची आलो मी सोडा ।

प्रखर आपुली भूक शमविण्या रिपु नरडी फोडा ॥

होईल तोफ शिवबाची । क्षणीं दो क्षणिंची । खिंड लढवावी ।

फेडाया ऋण या भूचें ।

अजि उष्ण बिंदु रक्ताचे ।

द्या मुद्दल मोजुनि साचें ।

व्याज तिला स्वातंत्र्य देउनी फेडा कर्जाला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

काय वाजलें ? बाजीराया बार न गडिं झाला ।

शिला कोसळे, पान सळसळे, पक्षी ओरडला ॥

लढा तरी मग वीर चला हो रणांत घुसलों मी ।

रक्तें मढवूं लढवूं खिंडिची तसू तसू भूमी ॥

शपथ तुम्हाला वृक्ष, पक्षि, जल, शिला तेज, वारे ।

मरतां आम्ही तोफेपूर्वी लढा तुम्ही सारे ॥

देहबंध तो तुटला बाजीराय धरे पडला ।

वीरवराचा विव्हल आत्मा नयनाशीं भिडला ॥

तों बार धडाधड झाले । प्राण परतले ।हास्य मुख केलें ।

हा पहिला बार शिवाचा ।

हा दुसरा निजधर्माचा ।

हा तिसरा निजदेशाचा ।

हा चवथा कर्तव्याचा |

बार पांचवा धडाडला हर बोला ज्या झाला ।

चला घालुं स्वातंत्र्य संगरीं रिपूवरीं घाला ॥

दिव्य द्युतिचा चकचकाट आकाशीं कोंदटला ।

रथ श्रीमती स्वतंत्रतेचा भूवरती आला ॥

ऊठ चितोडा ऊठ देविला उत्थापन द्याया ।

प्रतापसिंहा प्रथित विक्रमा उठि मंगल समया ॥

भूमातेच्या तान्ह्या उठि कां वीतचिंत व्हाना ? ।

असे कुशल रांगण्यांत तुमचा जिवलग शिवराणा ॥

स्वांतत्र्याचा पोवाडा हा ऐकाया आलां ।

उठा सर्व स्वातत्र्यवीरवर जयमंगल बोला ॥

श्री स्वतंत्रता भगवती । बाजिला नेती । आपुल्या रथीं ।

गंधर्व तनन तैं करिती ।

दुंदुभी नभीं दुमदुमती ।

श्री बाजी स्वर्गा जाती ।

करी चराचर विश्व बाजिच्या जयजयकाराला ।

चला घालुं स्वांत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

चला मराठे रणीं पहुडले जे आणिक सुर ते ।

पावन खिंडिंत बसून तीसह जाति नभः पंथे ॥

श्री बाजीचें रक्त पेरिलें खिंडिंत त्या काळा ।

म्हणुन रायगडिं स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला ॥

अहो बंधु हो पूर्वज ऐसे स्वतंत्र रणगाजी ।

स्वतंत्र त्या पूर्वजां शोभतां वंशज कां आजी? ॥

विनवि विनायक समजुनि घ्यावें यांतिल अर्थाला ।

स्वदेश नाहीं स्वराज्य नाहीं धिक् या देहाला ।

चला घालुं स्वातंत्र्यसंगरीं रिपूवरी घाला ॥

 

– स्वातंत्र्यवीर सावरकर