भारताने घटना गोमंतकीयांवर लादली

काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडीस यांची मुक्ताफळे पणजी : काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी बाणवली येथील एका सभेत भारतीय घटना ही गोमंतकीयांच्या डोक्यावर लादली आणि गोमंतकियांचे ते दुर्दैव आहे, असे निवेदन आपण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर केले होते असे जाहीरपणे सांगून सर्वांनाच धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाने विरियातो फर्नांडिस यांच्या निवेदनाचा तीव्र […]

भारताने घटना गोमंतकीयांवर लादली

काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडीस यांची मुक्ताफळे
पणजी : काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी बाणवली येथील एका सभेत भारतीय घटना ही गोमंतकीयांच्या डोक्यावर लादली आणि गोमंतकियांचे ते दुर्दैव आहे, असे निवेदन आपण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर केले होते असे जाहीरपणे सांगून सर्वांनाच धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाने विरियातो फर्नांडिस यांच्या निवेदनाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. बाणावली येथे काँग्रेसच्या जाहीर सभेत काल सोमवारी सायंकाळी बोलताना विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले की काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे इसवी सन 2019 मध्ये जेव्हा गोव्यात आले होते, त्यावेळी सिदाद दे गोवा हॉटेलवर आम्हाला माजी प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भेटायला बोलावले होते. आपण दुहेरी नागरिकत्वाच्या बाजूने आहे आणि राहुल गांधी यांना आपण भेटून गोमंतकीय जनतेसाठी दुहेरी नागरिकत्वाची मागणी केली.
हे घटनेच्या चौकटीत बसते काय?
आपली मागणी ऐकून राहुल गांधी यांनी हे सर्व घटनेच्या चौकटीत बसते काय? असा सवाल केला असता आपण त्यांना सांगितले की भारताची घटना ही 1950 मध्ये झाली. त्यावेळी गोवा हा भारताचा भाग नव्हता. 1961 मध्ये गोवा भारतात विलीन झाला. त्यानंतर भारत सरकारने भारताची घटना आम्हा गोमंतकीयांच्या डोक्यावर लादली आहे. अशा पद्धतीचे निवेदन आपण राहुल गांधी यांच्याकडे केल्याचे फर्नांडिस म्हणाले. भारताची घटना आमच्यावर लादल्यामुळे समस्या निर्माण झाली. अनेक गोमंतकीय जे पोर्तुगालमध्ये राहत होते त्यांच्या जमिनी गोव्यात आहेत, मालमत्ता गोव्यात आहेत त्यांनी काय करायचे असा अहवाल केला आणि दुहेरी नागरिकत्व हे या आमच्या गोयकारांना मिळाले पाहिजे असे विरियातो फर्नांडिस म्हणाले.
भाजपकडून फर्नांडिस यांचा तीव्र निषेध
फर्नांडिस यांच्या या निवेदनाने एकच खळबळ माजली असून भाजपचे प्रदेश प्रवक्ता गिरीराज पै वेर्णेकर यांनी फर्नांडिस यांचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. फर्नांडिस हे त्यांच्या इंडिया आघाडीचे उमेदवार असल्यामुळे भारतीय घटनेच्या विरोधात बोलण्याचे धाडस ते करतात यावरुन या आघाडीचा प्रेरणेतूनच त्यांनी हे वक्तव्य केले असावे. फर्नांडिस हे माजी नौदल सैनिक असून ते देशाबद्दल व भारतीय घटनेबद्दल आदर दाखवतील, अशी आपण अपेक्षा बाळगली होती परंतु ती त्यांनी फोल ठरवली आहे, अशा शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला.