शॉर्ट सर्किटमुळे ओटवणेत फरसाण फॅक्टरीला आग

आगीत सुमारे पावणे दोन लाखांचे नुकसान ओटवणे प्रतिनिधी शॉर्ट सर्किटमुळे ओटवणे कापईवाडी येथे लाडू फरसाण बनवण्याच्या अंश प्रॉडक्ट्सच्या भट्टीतील तेलाच्या कडईला अचानक आग लागून उडालेल्या आगीच्या भडक्यात भट्टीसह बेकरीचा तयार व कच्चा माल आणि इमारतीचा काही भाग भस्मसात झाला. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेत सुमारे पावणे […]

शॉर्ट सर्किटमुळे ओटवणेत फरसाण फॅक्टरीला आग

आगीत सुमारे पावणे दोन लाखांचे नुकसान
ओटवणे प्रतिनिधी
शॉर्ट सर्किटमुळे ओटवणे कापईवाडी येथे लाडू फरसाण बनवण्याच्या अंश प्रॉडक्ट्सच्या भट्टीतील तेलाच्या कडईला अचानक आग लागून उडालेल्या आगीच्या भडक्यात भट्टीसह बेकरीचा तयार व कच्चा माल आणि इमारतीचा काही भाग भस्मसात झाला. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेत सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. सौ मनाली महेश बांदेकर यांची कापईवाडीत एका घरात लाडू, फरसाण, खाजा, शेव चिवडा बनवण्याची भट्टी आहे. दुपारी १२ च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भट्टीतील सुमारे ४० लिटर तेल असलेल्या कडईतील तेलाने अचानक पेट घेतला. यावेळी बांदेकर दांपत्यासह महिला कामगारांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र कडईतील संपूर्ण तेलानेच पेट घेतल्यामुळे त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. आगीच्या ज्वालांचा भडका इतका उडाला की या अग्नी प्रलयात भट्टी भस्मसात झालीच शिवाय पत्रे जळून भिंतीनाही तडे गेले. यावेळी बाबल पंधारे, नारायण कर्पे, योगेश सावंत, संतोष काटाळे, सत्यवान गावकर, ईश्वर काटाळे, रमेश वरेकर, सहा आसनी रिक्षा चालक श्री रेडकर, सुरज गावकर, रोहिदास कासकर आदी युवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत घराच्या छप्पराला लागलेली आग विझविली. अन्यथा संपूर्ण घरच बेचिराख झाले असते. या भट्टीतील इतरही सामानासह वायरिंग, टोप भस्मसात झाले. आगीच्या मोठ्या ज्वालांसह धुरामुळे घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. सावंतवाडी नगरपालिकेचा बंम्ब दोन तासानंतर घटनास्थळी आला मात्र तोपर्यंत आगीच्या रुद्रावतारात सर्व सामान जळून खाक झाले.या घटनेची माहिती मिळताच तलाठी युव्ही सोनवलकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि नुकसानीचा पंचनामा केला. सौ मनाली आणि महेश बांदेकर यानी कष्ट करीत पाच वर्षांपासून हा व्यवसाय सुरु केला होता. आत्ताच कुठे या व्यवसायात त्यानी जम बसवायला सुरुवात केली होती. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्यावर दुःखाचे आभाळच कोसळले आहे.