21 आठवडे पुरेल इतका चारासाठा
पशुसंगोपनचा दावा : 13 लाख मेट्रिकटन चारासाठा शिल्लक, काही ठिकाणी चारा छावण्या सुरू
बेळगाव : जिल्ह्यात चारा संकट गडद होत असले तरी पशुसंगोपनने पुढील 21 आठवडे चारा पुरेल इतका साठा असल्याचा दावा केला आहे. गतवर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वत्र चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चिकोडी, अथणी आणि गोकाक तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यात एकूण 13 लाख 53 हजार 836 मेट्रिक टन चारासाठा शिल्लक असून पुढील तीन महिने काळजी करण्याची गरज नसल्याची माहितीही पशुसंगोपनने दिली आहे. जिल्ह्यात 14 लाखांहून अधिक मोठ्या जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा, गाढव आदींचा समावेश आहे. मोठ्या जनावरांना दिवसाकाठी 20 ते 25 किलो चाऱ्याची गरज भासते. वाढत्या उन्हामुळे नदी, विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळी खाली गेली आहे. त्यामुळे नवीन ओल्या चाऱ्याची निर्मिती करणेही अशक्य होवू लागले आहे. त्यामुळे काही ठिकाणी चाऱ्याची कमतरता भासू लागली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने चिकोडी तालुक्यातील बेळकुट्टगेट, अथणी तालुक्यातील ककमरी, अनंतपूर तर गोकाक तालुक्यातील कडबगट्टी गावांमध्ये चारा छावण्या सुरू केल्या आहेत. येथे शेतकऱ्यांना दोन रुपये किलो प्रमाणे चाऱ्याचे वितरण केले जात आहे., असे असले तरी जिल्ह्यात इतर ठिकाणी पुढील चार महिने पुरेल इतका चारासाठा शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपुष्टात आल्याने ओला चारा कमी झाला आहे. काही ठिकाणी केवळ सुक्या चाऱ्यावर जनावरांचे संगोपन सुरू आहे. नैसर्गिक व कृत्रिम तयार झालेल्या चाऱ्यावर चारासाठा किती आहे? याचा अंदाज बांधला जातो. मात्र यंदा पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने आणि काही ठिकाणी वळिवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याबरोबर चारा संकटही आवासून उभे आहे. सद्यस्थितीत चिकोडी, अथणी, गोकात तालुक्यातील काही गावांमधील चाऱ्याची कमतरता आहे. या ठिकाणी चारा बँक सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय जनावरांना कोणत्याही परिस्थितीत चारा, पाणी कमी पडू देणार नाही, असा दावाही पशुसंगोपनने केला आहे.
पाणी-चारा व्यवस्थपनाच्या सूचना
जिल्ह्यात 75 ग्राम पंचायतींना पाणी आणि चारा व्यवस्थपनाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. चिकोडी, अथणी आणि गोकाक तालुक्यातील चार गावांमध्ये चारा छावण्या सुरू केल्या आहेत. शिवाय कोठेही चारा, पाण्याची कमतरता जाणवणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
डॉ. यरगट्टी-प्रभारी सहसंचालक-पशुसंगोपन
Home महत्वाची बातमी 21 आठवडे पुरेल इतका चारासाठा
21 आठवडे पुरेल इतका चारासाठा
पशुसंगोपनचा दावा : 13 लाख मेट्रिकटन चारासाठा शिल्लक, काही ठिकाणी चारा छावण्या सुरू बेळगाव : जिल्ह्यात चारा संकट गडद होत असले तरी पशुसंगोपनने पुढील 21 आठवडे चारा पुरेल इतका साठा असल्याचा दावा केला आहे. गतवर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वत्र चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चिकोडी, अथणी आणि गोकाक तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या […]
