तीन दिवसांत इंग्लिश महिलांचा खेळ खल्लास

टीम इंडियाचा कसोटीतील सर्वात मोठा विजय : इंग्लंडला तब्बल 347 धावांनी केले पराभूत : वृत्तसंस्था/ नवी मुंबई सामनावीर दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडवर तब्बल 347 धावांनी विजय संपादन केला. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी पाहुण्या संघाला नमवताना कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या […]

तीन दिवसांत इंग्लिश महिलांचा खेळ खल्लास

टीम इंडियाचा कसोटीतील सर्वात मोठा विजय : इंग्लंडला तब्बल 347 धावांनी केले पराभूत :
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
सामनावीर दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडवर तब्बल 347 धावांनी विजय संपादन केला. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी पाहुण्या संघाला नमवताना कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे, भारतीय महिला संघाचा इंग्लंडविरुद्ध हा एकूण तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2006 आणि 2014 मध्ये विजय मिळवला होता.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 428 धावा ठोकल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 136 धावांत आटोपला. भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 186 धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर भारताने इंग्लंडसमोर 479 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 131 धावांवर गारद झाला. सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी दीप्ती शर्मा व पूजा वस्त्राकारच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या महिला खेळाडूंनी सपशेल हार पत्कारली. याआधी उभय संघात झालेल्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-1 अशी बाजी मारली होती. पण कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने त्या पराभवाचा हिशेब बरोबरीत केला. दोन्ही डावात 9 बळी व पहिल्या डावात शानदार अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
तीनही दिवस टीम इंडियाचे वर्चस्व
पहिल्या डावात 428 धावा केल्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 136 धावांत गुंडाळले. अशा स्थितीत भारताकडे पहिल्या डावात 292 धावांची मोठी आघाडी होती. यानंतर टीम इंडियाने दुसरा डाव सहा विकेट्सच्या मोबदल्यात 186 धावांवर घोषित केला. कर्णधार हरमनप्रीतने तिसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला डाव घोषित केला व इंग्लंडला विजयासाठी 479 धावांचे टार्गेट मिळाले. फिरकीला साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर पहिल्या डावाप्रमाणचे दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या खेळाडूंनी नांगी टाकली.
विजयासाठीच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून दुसऱ्या डावात कर्णधार हीदर नाईटने सर्वाधिक 21 धावा केल्या. याशिवाय, चार्ली डीनने नाबाद 20 धावा केल्या. या दोघांशिवाय एकही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करू शकली नाही. सलामीवीर टॅमी ब्युमॉन्ट दुसऱ्या डावातही अपयशी ठरली. तिने 26 चेंडूत 17 धावा केल्या. यानंतर आलेल्या सोफिया डंकलेला 15 धावांवर बाद करत पूजा वस्त्राकरने तिला पॅव्हेलियनमध्ये पाठवत दुसरा धक्का दिला. केट क्रॉसने 16, डॅनियल वेटने 12 आणि सोफी एक्लेस्टोनने 10 धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केल्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव 27.3 षटकांत 131 धावांवर आटोपला. या सामन्यात पाहुण्या संघाला दारुण हार पत्कारावी लागली. यावेळी भारताच्या दीप्ती शर्माने पुन्हा एकदा धमाकेदार गोलंदाजी करताना 8 षटकात 32 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच पूजा वस्त्राकरने 3, राजेश्वरी गायकवाडने 2 आणि रेणुका ठाकूरने 1 विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : भारत प.डाव 428 व दुसरा डाव 42 षटकांत 6 बाद 186 घोषित (शेफाली वर्मा 33, स्मृती मानधना 26, जेमिमा रॉड्रिग्ज 27, हरमनप्रीत कौर नाबाद 44, पूजा वस्त्राकार नाबाद 17, चार्ली डीन 68 धावांत 4 बळी).
इंग्लंड प.डाव 136 व दुसरा डाव 27.3 षटकांत सर्वबाद 131 (हीदर नाईट 21, चार्ली डीन नाबाद 20, केट क्रॉस 16, टॅमी ब्युमॉन्ट 17, सोफिया डंकले 15, दीप्ती शर्मा 32 धावांत 4 बळी, पूजा वस्त्राकार 23 धावांत 3 बळी).
 
टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय
भारतीय महिला क्रिकेट संघाचा कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. मुंबईत झालेल्या या एकमेव सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा तब्बल 347 धावांनी धुव्वा उडवला. धावांच्या बाबतीत मिळवलेला हा भारताचा सर्वात मोठा विजय आहे. याआधी 1998 मध्ये श्रीलंकन महिला संघाने पाकिस्ताविरूद्ध 309 धावांनी विजय मिळवला होता. याशिवाय. 1972 मध्ये न्यूझीलंड महिला संघाने आफ्रिकन महिला संघाला 188 धावांनी नमवले होते. या यादीत न्यूझीलंडची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
योजनेनुसार खेळ केल्याचा फायदा, प्रशिक्षक मुजुमदार यांचेही मोलाचे योगदान
इंग्लंडविरुद्ध दमदार विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने शनिवारी मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार यांना संघासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचे श्रेय दिले. मुजुमदार सरांनी आम्हाला खूप मदत केली. मला कसोटीत संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव नव्हता. पण मला मुझुमदार सरांच्या निर्णयांवर विश्वास होता, त्यांनी फलंदाजी व गोलंदाजीत काही बदल केले त्याचा आम्हाला मोठा फायदा झाल्याचे हरमनप्रीतने माध्यमांशी बोलताना सांगितले. सर्व खेळाडूंनी योजनेनुसार कामगिरी केल्याचे सांगताना तिने सर्वांचे कौतुक केले. प्रत्येक खेळाडू मग तो फलंदाज असो किंवा गोलंदाज त्यांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली असल्याचेही तिने सांगितले.

Go to Source