जांबोटी-ओलमणी परिसरात काजू बागा बहरल्या

उत्पादकांमधून समाधान : ओसाड माळरानावरील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात काजू झाडांची लागवड वार्ताहर /जांबोटी जाबोटी-ओलमणी परिसरात काजू झाडांना मोहर येण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. जानेवारी महिन्यातच सर्वत्र काजू झाडे मोहराने बहरल्यामुळे काजू उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात काजू उत्पादनासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे शेतकरी वर्गाने ओसाड माळरानावरील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात काजूरोपांची लागवड केली […]

जांबोटी-ओलमणी परिसरात काजू बागा बहरल्या

उत्पादकांमधून समाधान : ओसाड माळरानावरील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात काजू झाडांची लागवड
वार्ताहर /जांबोटी
जाबोटी-ओलमणी परिसरात काजू झाडांना मोहर येण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. जानेवारी महिन्यातच सर्वत्र काजू झाडे मोहराने बहरल्यामुळे काजू उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात काजू उत्पादनासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे शेतकरी वर्गाने ओसाड माळरानावरील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात काजूरोपांची लागवड केली आहे. काजू हे या भागातील प्रमुख नगदी पीक असल्यामुळे यापासून शेतकरी वर्गांना बऱ्यापैकी आर्थिक लाभ मिळतो. दरवर्षी काजू झाडांना डिसेंबर महिन्यापासून मोहर येण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होतो. यासाठी निरभ्र आकाश व उष्ण वातावरणाची आवश्यकता असते. यावर्षी थंडीची तीव्रता कमी असल्यामुळे काजू पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जानेवारी महिन्यातच काजू बागा मोहरल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. जानेवारी महिन्यात काजूला मोहर आल्यानंतर दरवर्षी मार्च महिन्यापासून काजू उत्पादनाला प्रारंभ होतो. शेतकरी वर्ग काजू झाडांचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी व काजू बिया गोळा करण्यास अनुकूल व्हावे या उद्देशाने जानेवारी महिन्यापासूनच काजू झाडांची साफसफाई आदी कामे हाती घेतात. सध्या या परिसरात काजू बागांच्या साफसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.
तूरळक ठिकाणी फळधारणेला प्रारंभ
काजू पिकाच्या फळधारणेसाठी पोषक वातावरण असल्यामुळे सध्या  संकरित जातीच्या काजू झाडांच्या फळधारणेला प्रारंभ झाला असल्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत प्रत्यक्षात काजू उत्पादनाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. पहाटेच्यावेळी पडणारे धुके तसेच दव व ढगाळ वातावरणामुळे काजू मोहर व नुकतीच फळधारणा होत असलेल्या काजू पिकाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी वर्गांना बागायती खात्याने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.