रांजणगावाचा श्री महागणपती: दहा हात असलेले महाशक्ती व तेजस्वी स्वरूप
Maharashtra Tourism : श्री महागणपती मंदिर रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातआहे, जे अष्टविनायकांपैकी जागृत मानले जाते. हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित असून, अष्टविनायक मधील आठवा गणपती म्हणून ओळखले जाते.
ALSO READ: विघ्नहर्ता, संकटमोचक ओझर येथील श्री विघ्नेश्वर
मंदिराची वैशिष्ट्ये-
श्री महागणपती मंदिर पूर्वाभिमुख असून, त्याची रचना दक्षिणायन आणि उत्तरायन यांच्या मध्य काळात सूर्याची किरणे गणपतीच्या मूर्तीवर पडतात, ज्यामुळे मूर्तीला सोनेरी तेज प्राप्त होते. मंदिराचे बांधकाम 9व्या आणि 10व्या शतकातील आहे, तर गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला आणि सभामंडप इंदूरचे सरदार किबे यांनी बनवले. गाभाऱ्यातील गणपतीची मूर्ती डाव्या सोंडेची, कमळावर आसनस्थ असून, तिच्या दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धी आहे. मूळ मूर्ती, जिला ‘महोत्कट’ म्हणतात, तळघरात असून तिला 10 सोंडा आणि 20 हात असल्याचे मानले जाते, परंतु ती सामान्यतः दर्शनासाठी उपलब्ध नसते.
ALSO READ: मातृभक्त आणि संयमाचा आदर्श श्री गिरीजात्मज, डोंगरावर असलेलं अष्टविनायकातील एकमेव मंदिर लेण्याद्री
पौराणिक कथा-
आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही, असा वर त्रिपुरासुराने मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. सर्व देवांना त्याने पराभूत केले. सर्व देव हिमालयात दडून बसले. त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली. त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले. ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले, “यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल. त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली. नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. शंकराने “प्रणम्य शिरसा देवम्’ या श्लोकाचे स्मरण करून, एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला “त्रिपुरी पौर्णिमा’ म्हणतात. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते.
ALSO READ: चिंता हरून शांती देणारा श्री चिंतामणी, थेऊर येथील बाप्पाच्या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये सुंदर हिरे जडलेले
उत्सव-
भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या काळात मोठा उत्सव साजरा होतो. भाद्रपद गणेशोत्सवात चारही दिशांना असलेल्या गणपतीच्या बहिणींच्या मंदिरांना पालखीने भेट दिली जाते. रांजणगावचा महागणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. स्थानिक गावकरी भाद्रपदात घरी गणपती स्थापना न करता मंदिराच्या पूजेत सहभागी होतात.
ALSO READ: वरदान देणारा करुणामय देव श्री वरदविनायक, महड
श्री महागणपती मंदिर रांजणगाव जावे कसे?
हे मंदिर पुणे-अहमदनगर महामार्गावर पुण्यापासून सुमारे 50-52 किमी आणि शिरूरपासून 21 किमी अंतरावरआहे. पुणे किंवा शिरूरहून रांजणगावला एसटी बसेस, रिक्षा, कॅब किंवा खासगी वाहनाने जाता येते. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन पुणे आणि विमानतळ पुणे आहे.