राज्य द्राक्ष बागायतदार संघाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी, बांगलादेशकडून भारतीय द्राक्षमालाची अडवणूक

नाशिक (पालखेड मिरचीचे/दिंडोरी): Bharat Live News Media वृत्तसेवा
बांगलादेशात पाठविल्या जाणाऱ्या द्राक्षावर प्रतिकिलो १०६ रुपये आयातशुल्क आकारले जात असल्याने प्रत्यक्ष द्राक्ष बागायतदारांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. राज्य शासनाने संत्र्याप्रमाणेच द्राक्षावरील बांगलादेशातील आयात शुल्कावर पन्नास टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
बांगलादेशने द्राक्षावरील आयात शुल्कात वाढ झाल्याने नाशिकमधून निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दर कमी झाल्याचा थेट फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत बांगलादेशात निर्यात होणाऱ्या संत्र्यावर देशाकडून आकारण्यात येणाऱ्या आयात शुल्काच्या 50 % म्हणजेच सध्याच्या 88 रुपयांच्या आयात शुल्काच्या 50 टक्के सवलत दिली जाईल. बांगलादेशातील संत्र्यासाठी प्रतिकिलो म्हणजे 44 रुपये प्रतिकिलो अनुदानाचा राज्य सरकारमार्फत देण्याचा निर्णय घेतला गेला. आजमितीस बांगलादेशात द्राक्षांवर 106.76 रुपये प्रतिकिलो आयातशुल्क असल्याने संत्र्यावरील अनुदानाप्रमाणेच, द्राक्षावरील आयात शुल्काच्या 50 टक्के आयात शुल्क म्हणजेच 53 रुपये तत्काळ मंजूर करण्यात यावे. द्राक्ष हंगाम सुरू झाला असून, राज्य सरकारने या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करावी, जेणेकरून बांगलादेशमध्ये सध्या बंद झालेली द्राक्षांची निर्यात पुन्हा सुरू होण्यास मदत होईल आणि त्याचा द्राक्ष उत्पादकांना फायदा होईल, अशी मागणी करण्यात आली.
जहाजांचा आफ्रिकेला वळसा
आखाती देशांतील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तसेच येमेनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे भारतातून युरोप, ब्रिटन, रशिया येथे निर्यात होणाऱ्या मालवाहू जहाजांना खूप फटका बसला आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे सुएझ कालव्याऐवजी आफ्रिकेला वळसा घालून जहाजांची वाहतूक होत आहे. याचा थेट परिणाम वाहतूक भाडे 1700 ते 1800 डॉलर्सवरून थेट 6000 डॉलरवर झाला आहे. म्हणजेच 50 रुपयांनी वाढ झाली आहे. 30 रुपये प्रतिकिलो वाहतूक खर्च आणि थेट भाव कमी करून तो शेतकऱ्यांकडून वसूल केला जात आहे. पूर्वी दिलेले ५० टक्के मालवाहतुकीचे अनुदान बंद करण्यात आले आहे. हे अनुदान पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासराव भोसले, नाशिक विभागीय अध्यक्ष ॲड रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख सुरेश कळमकर आदी शिष्टमंडळाने केली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन
हिवाळी अधिवेशात संत्रा पिकास निर्यात शुल्क अनुदान दिले, त्याच धर्तीवर द्राक्षपिकाचे निर्यात शुल्कामध्ये पन्नास टक्के अनुदान देण्याची मागणी यावेळी द्राक्षबागायतदार संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चितच सकारत्मक निर्णय घेत मार्ग काढला जाईल, असे सांगत द्राक्ष कर्जाच्या व्याजात सवलत देण्याचे विचारधीन असल्याचे सांगुन द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, हिरामण खोसकरसुध्दा उपस्थित होते.
हेही वाचा:
ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनाऱ्यावर ४ भारतीयांचा बुडून मृत्यू
पुणे शहरातील सतरा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
हजारोंची गर्दी आणि अदम्य उत्साह ! पाहा मराठा मोर्चाचे खास फोटो
Latest Marathi News राज्य द्राक्ष बागायतदार संघाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी, बांगलादेशकडून भारतीय द्राक्षमालाची अडवणूक Brought to You By : Bharat Live News Media.
