जनाई-शिरसाईवरून काका-पुतण्यात श्रेयवाद..
बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : जनाई-शिरसाई योजनेवरून सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात सध्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. माझ्या सहीने ही योजना मार्गी लागल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मंत्रालयात या, कोणाच्या सहीने ही योजना झाली ते दाखवतो,’ असे सांगितले.
रविवारी (दि. 21) पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, मला वरिष्ठांबद्दल टीकाटिप्पणी करायची नाही. पण, जिल्ह्याचा पालकमंत्री आणि कालवा नियोजन समितीचा अध्यक्ष या नात्याने माझ्याकडूनच हे काम मार्गी लागणार. सुपे परिसरातील काही गावांतील शेतकरी पुण्यातील सिंचन भवन येथे योजनेबाबतच्या तक्रारीसाठी गेले होते. परंतु, अधिकार्यांनी ऐकून न घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुपे परिसरातील शेतकर्यांशी चर्चा केली.
शरद पवार यांनी गोविंदबागेत येण्याचे शेतकर्यांना निमंत्रण दिले. शेतकर्यांनी या वेळी योजनेच्या तक्रारींचा पाढा वाचला. शरद पवार यांनी जलसंपदा खाते असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. यासंबंधीची बैठक 23 जानेवारी रोजी निश्चित केली. ही बैठक ठरल्याचे कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि. 20) सुप्यात टंचाईनिवारण आढावा बैठक घेतली. शिवाय, आपल्या हाताचा अंगठा पुढे करीत याच हाताने हे काम होणार आहे, इतर कोणीही ते करू शकणार नाही. राज्यातील 288 मतदारसंघांतील आमदारांपैकी फक्त मीच हे काम करू शकतो, असे ठामपणे सांगितले.
यासंबंधी अजित पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, जिल्ह्यातील पाण्याचे नियोजन त्या भागातील लोकप्रतिनिधींना, जलसंपदाच्या अधिकार्यांना बरोबर घेऊन करीत असतो. त्यानुसार आम्ही नियोजन केले आहे. आता फेब—ुवारीत बैठक घेत उन्हाळी नियोजन करणार आहे. मोठ्या लोकसंख्येच्या शहरांतील नागरिकांना पिण्याचे आणि शेतकर्यांनाही पाणी देणे आवश्यक आहे. सध्याची पाण्याची परिस्थिती बघता काटकसरीने वापर केला, तर उन्हाळा ठीक जायला
मदत होईल.
सुळेंच्या वक्तव्यावर ‘नो कॉमेंट्स’
खासदार सुप्रिया सुळे यांनी पाण्याचे नियोजन करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. याबाबत अजित पवार यांनी ‘नो कॉमेंट्स’ म्हणत प्रश्न टाळला.
‘कृषिक’ला मदतच
अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या ‘कृषिक’ प्रदर्शनाकडे फिरकले नसल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, ‘कृषिक’च्या उद्घाटनाला दरवर्षी केंद्र व राज्यातील प्रमुखांना, राजकीय व्यक्तींना बोलावले जाते. उद्घाटनाच्या दिवशी मुंबईत महत्त्वाच्या बैठका होत्या. त्यामुळे यायला जमले नाही. अशी प्रदर्शने झाली पाहिजेत. त्यातून शेतकर्यांना अनेक गोष्टी समजतात. दरवर्षीची प्रदर्शनाची परंपरा असून, त्याला आजवर सहकार्यच करीत आलो आहे.
हेही वाचा
सर्वात धोकादायक पुलाचा व्हिडीओ!
रशियातील अनोखे थीम पार्क
शेतकर्यांच्या कर्जमाफीला प्राधान्य : खासदार सुप्रिया सुळे
Latest Marathi News जनाई-शिरसाईवरून काका-पुतण्यात श्रेयवाद.. Brought to You By : Bharat Live News Media.