‘भूतान मॉडेल’मुळे भारतात वन क्षेत्र वाढ शक्य

औदुंबर शिंदे
पणजी ः भारतातील वन क्षेत्र वाढवण्यासाठी ‘भूतान मॉडेल’ची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव वैज्ञानिकांनी केंद्र सरकारला दिला आहे. यासंबंधी झुआरी-वास्को येथील बिटस् पिलानी या शैक्षणिक संस्थेत झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांनी विविध निरीक्षणे नोंदवली. याचा तपशील केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे.
विविध प्रदेशांची भाषा व संस्कृती जशी वेगवेगळी असते, त्याच पद्धतीने जैवविविधता ही प्रत्येक क्षेत्राची वेगळी असते. झाडांनाही आपले स्वतःचे असे वेगळे नैसर्गिक स्थान आहे. त्यामुळे एकाच प्रकारची झाडे दुसर्या प्रदेशात वाढत नाहीत. कमी पाण्यावर जगणारी आकेशियासारखी परदेशी झाडे भारतात आणली गेली आणि भारतीय जंगल संपत्ती संपुष्टात आली, असे मत या परिषदेत वैज्ञानिकांनी व्यक्त केले.
‘गोव्याचे मॉडेल’ही गाजेल…
राज्यातील वन क्षेत्र सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जेवढी वन खात्याची आहे तेवढी सर्वसामान्य लोकांचीही आहे. सामान्यांचा या कार्यात समावेश करून घेण्यासाठी गोवा जैवविविधता मंडळाने बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट जाहीर करण्याचे ठरवले आहे. या क्षेत्रातील वनराई सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित भागातील स्थानिकांना दिली जाईल. आतापर्यंत सुर्ला-कोठंबी येथील ‘पूर्वातली राय’ हे क्षेत्र जैवविविधता वारसास्थळ म्हणून घोषित झाले आहे. त्याच पद्धतीने राज्यातील अजून तीन क्षेत्र लवकरच जाहीर केले जाणार आहे. असे झाल्यास गोव्याचे मॉडेलही ‘भूतान मॉडेल’प्रमाणे देशभर गाजेल, असे डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी सांगितले.
झाडांनाही असतात संवेदना…
झाडांनाही संवेदना आहेत, झाडे एकमेकांच्या भावना समजून घेतात. जमिनीखालून त्यांची मुळे एकमेकांना मदत करतात. ज्या ठिकाणी मुबलक पाणी असते त्या परिसरातील झाडे पाणी शोषून ते भूमिगत जलवाहिनी जोडल्यासारखे सर्व झाडांना पुरवतात. भूतानमध्ये तर जंगलाचा एक वेगळाच प्रयोग करण्यात आला आहे. त्या ठिकाणी काही जंगले एकाच प्रकारच्या झाडांची आहेत. त्यामुळे प्रत्येक झाडाची वेगवेगळी जंगले येथे आढळतात.
भारतात मात्र एका जंगलात विविध प्रकारची झाडे आढळतात. वन क्षेत्र वाढवण्यासाठी ‘भूतान मॉडेल‘ भारतात उपयुक्त ठरणार असून, एकाच प्रकारच्या झाडांचे जंगल वाढवण्याची पद्धती विकसित केली गेल्यास वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मांडण्यात आला आहे.
के. के. बिर्ला संस्थानमधील बिडस् पिलानी इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध वैज्ञानिकांनी आपले प्रबंध सादर केले. यात अरुणाचल विद्यापीठाचे माजी कुलगुरू बी. मोहन कुमार, प्रा. अमित गर्ग, भूतान येथील इकॉलॉजिकल सोसायटीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी नामजिएल वांगडू, गोवा बायोडायव्हर्सिटी बोर्डचे संचालक डॉ. प्रदीप सरमोकादम, राज्याचे मुख्य वनपाल के. उमाकांत, प्रा. आनिन्य भट्टाचार्या व राजकुमार चतुर्वेदी यांचा समावेश आहे.
Latest Marathi News ‘भूतान मॉडेल’मुळे भारतात वन क्षेत्र वाढ शक्य Brought to You By : Bharat Live News Media.
