ढीगभर पुरावे, तरीही ‘एनटीए’चा बचाव

नवी दिल्ली : ‘नीट’मध्ये पेपरफुटी झाल्याचे बिहार आणि गुजरातच्या पोलिसांनी केलेल्या तपासातून उघड झाले आहे. गोध्रा येथे विद्यार्थ्यांनी एजंटला मोठी रक्कम देऊन फुटलेले पेपर खरेदी केले. एका शिक्षकाच्या मोटारीतून 7 लाखांची रोकडही पोलिसांनी जप्त केली. पाटण्यात फुटलेल्या प्रश्नपत्रिका जाळण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. ढीगभर पुरावे मिळूनही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेपरफुटी झाल्याचे कुठलेही पुरावे …

ढीगभर पुरावे, तरीही ‘एनटीए’चा बचाव

प्रथमेश तेलंग

नवी दिल्ली : ‘नीट’मध्ये पेपरफुटी झाल्याचे बिहार आणि गुजरातच्या पोलिसांनी केलेल्या तपासातून उघड झाले आहे. गोध्रा येथे विद्यार्थ्यांनी एजंटला मोठी रक्कम देऊन फुटलेले पेपर खरेदी केले. एका शिक्षकाच्या मोटारीतून 7 लाखांची रोकडही पोलिसांनी जप्त केली. पाटण्यात फुटलेल्या प्रश्नपत्रिका जाळण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. ढीगभर पुरावे मिळूनही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेपरफुटी झाल्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगून राष्ट्रीय चाचणी संस्थेचा (एनटीए) बचाव केला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधील असंतोष वाढत चालला आहे.
गुजरातच्या गोध्रा येथील जय जलाराम शाळेतील केंद्रावर 5 मे रोजी नीट परीक्षा सुरू होती. त्यावेळी पंचमहालच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी तुषार भट्ट नावाच्या केंद्र संचालक शिक्षकाला ताब्यात घेतले होते. या शिक्षकाच्या मोटारीतून पोलिसांनी 7 लाखांची रोकड जप्त केली. पेपर फोडणार्‍या दलालांनी त्याच्याशी संधान साधून प्रश्नपत्रिका बाहेर आणल्या होत्या. या दलालांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 10 लाख रुपये उकळल्याचेही पोलिस तपासात उघड झाले. विद्यार्थ्यांना येत नसलेल्या प्रश्नांची उत्तरे भट्ट लिहून देणार होता. बिहारच्या पाटण्यात नीट परीक्षेआधी, पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला. तिथे जळालेल्या प्रश्नपत्रिका आढळून आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली. जळालेल्या प्रश्नपत्रिकांचे तुकडे पोलिसांनी गोळा केले. आर्थिक गुन्हे शाखेने मूळ प्रश्नपत्रिकेशी त्याची जुळवाजुळव सुरू केली. पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी हे तुकडे पाठविले आहेत. या तपासातून नीटचे पेपर खरेच फुटले होते काय, याचा उलगडा होणार आहे.
ग्रेस गुणांचे वादळ
निव्वळ पेपरफुटीचाच मुद्दा नाही तर 1563 विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस गुणांच्या मुद्द्यावरून वादळ उठले आहे. काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळाला नसल्याने त्यांना ग्रेस गुण देण्यात आल्याचा राष्ट्रीय चाचणी संस्थेचा दावा आहे. सर्वोच्च न्यायालयाने ग्रेस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची पेरपरीक्षा घेण्याचेही आदेश दिले आहेत. मात्र, तरीही नीट परीक्षेतील गोंधळ शमलेला नाही.