खासदारांना लोकसेवेपेक्षा लोकमनोरंजनात रस : आढळराव पाटीलांची कोल्हेंवर टीका

उरुळी कांचन : Bharat Live News Media वृत्तसेवा : खासदारकी लोकसेवेसाठी की लोकमनोरंजनासाठी, हे विद्यमान खासदारांना कळलेच नाही. त्यामुळे निवडून आल्यानंतर आपल्याला हे जमणार नाही म्हणून राजीनामा द्यायला निघालेले खासदार संसदेत अभिनयाचा आवेश दाखवून भाषणबाजी करीत राहिले. आपल्या भाषणांची भुरळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना पडली, असे म्हणणार्यांनी शिरूर मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा बट्ट्याबोळ केला. खासदारांनी संसदेपेक्षा मालिका, नाटकबाजीत पाच वर्षे रस दाखविल्याने मतदारसंघातील समस्या ते सोडवू शकले नसल्याची टीका शिरूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
शिरूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी (दि. 12) पूर्व हवेलीतील कुंजीरवाडी, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबा, तरडे व वळती या गावांचा प्रचार दौरा केला. या वेळी सोरतापवाडी गावभेट दौर्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीकास्त्र सोडले. या दौर्यात प्रदीप कंद, अरुण गिरे, संदीप भोंडवे, दिलीप वाल्हेकर, श्यामराव गावडे, दिलीप काळभोर, नानासाहेब आबनावे, विपुल शितोळे, मोरेश्वर काळे, अण्णा महाडीक, अजिंक्य कांचन, सुनील कांचन, जितेंद्र बडेकर, सुदर्शन चौधरी, राजेंद्र चौधरी, शशिकांत चौधरी, विजय चौधरी, मनोज चौधरी, अमित कांचन, सरपंच स्नेहल चौधरी आदी उपस्थित होते.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, खेड व नंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा जनतेच्या प्रेमामुळे खासदारकीची संधी मिळाली. या 15 वर्षांच्या काळात जनतेचे प्रश्न लोकसभेत सोडविण्यासाठी वेळ दिला. मतदारसंघात वाड्या-वस्त्यांवर जाऊन जनसंपर्क ठेवून जनतेची कामे केली. मी स्वतः उद्योजक असल्याने अमेरिकेत राहून व्यवसाय बघत मी आयुष्य व्यतीत करू शकलो असतो. परंतु, जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारण करीत राहिलो.
मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये पुणे-नाशिक रस्ता, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे असेल आदी कामे मी दृष्टिपथात ठेवली होती. मात्र, 5 वर्षांत काय झाले, हे जनतेने अनुभवले आहे. शेतकरी, कामगार, असंघटित कामगार, बेरोजगारी, उद्योग व्यवसायासंदर्भात विक्रमी प्रश्न संसदेत विचारले. मतदारसंघात भरीव निधी आणला. अशावेळी मागील पाच वर्षांत काय काम झाले? असा माझा प्रश्न आहे. फक्त आवेशात संसदेत भाषणे करायची, भाषणांची मोदींना भुरळ पडल्याचे सांगायचे, राष्ट्रवादीशी एकनिष्ठता सांगता आणि मग शपथविधीला अजित पवार यांच्याबरोबर जाता तसेच खासदारकी मिळण्यासाठी भाजपला पाच वर्षे डोळे कोण मारत होते, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आढळराव पाटील यांनी केली.
हेही वाचा
चाकण एमआयडीसी वाहतूक कोंडीचे केंद्र : वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त
चंद्रपूरसह विदर्भातील सर्वच जागांवर महायुती जिंकेल : चित्रा वाघ
सातकरांच्या गाड्याने पटकाविला ‘घाटाचा राजा’ किताब..!
Latest Marathi News खासदारांना लोकसेवेपेक्षा लोकमनोरंजनात रस : आढळराव पाटीलांची कोल्हेंवर टीका Brought to You By : Bharat Live News Media.
